संस्कृती की विकृती…महिला दिन विशेष

सिंधू दर्पण: महिला दिन विशेष असं काय लिहावं खूप विचार केला मात्र रोजच्या सारखं मधाळ, ऐकाव वाटेल असं काही सुचलंच नाही. आता तुम्हा सर्वांनाच प्रश्न पडला असेल की साक्षात आदिशक्ती,आई,बहिण,मुलगी,अशी कित्तेक नाती निभावणारी स्त्री या स्त्रीचं महात्म्य एवढ आहे की लिहायला पान कमी पडतील,मग सुचलं कसं काहीच नाही….

जगाने स्त्री कडे एक आई,एक मुलगी,एक बहीण,एक मैत्रीण, आणि एक उपभोगाची वस्तु म्हणूनच पाहील आहे. तुम्हाला आई हवी,ताई हवी,पत्नी हवी पण मुलगी नको.. हे वाक्य सुद्धा तुम्ही खूप वेळ ऐकलं असेल..पण मग कुणी असं का म्हणत नाही..ती फक्त आई, ताई,बहिण ह्या सर्व नात्यांच्या कवनात बसते म्हणून मला नको आहे.. तर ती एक स्त्री आहे..आदिशक्ती आहे.सबंध सृष्टीची निर्मिती आहे.ती आहे म्हणून जीवन आहे म्हणून मला हवी आहे. ती स्त्री म्हणून मला हवी आहे.कारण तिच्याशिवाय सर्व व्यर्थ आहे… असं का म्हटलं जात नाही. केवळ आणि केवळ मला भविष्यात पत्नी मिळावी,बहिण मिळावी म्हणून का तिचा जन्म हवा..ती एक आई,बहिण, मुलगी ह्या सर्व नात्यांआधी एक स्त्री आहे,आणि म्हणूनच ती आई आहे असा विचार आपण का करत नाही.?

खरंच का आजची स्त्री सबला आहे? नाही ,मला मान्य आहे की स्त्री आता सर्वच क्षेत्रात पुरुषांसारखी अव्वल आहे.तिची भरारी खूप उंच गेली आहे. अस आहे तर मग अजूनही “बेटी बचाओ बेटी पढाओ” का? का अजूनही अब्रूची लक्तर ओरबाडून खाणाऱ्या नराधमाला शिक्षा व्हावी, त्या स्त्रीला न्याय मिळावा म्हणून आपण मात्र मोर्चा,आंदोलनं करावीत,मेणबत्त्या पेटवाव्यात.. आणि त्याने काय होईल…वस्तूस्थिती तर ही आहे की जिथे तुम्ही एक मुलीच्या अब्रु साठी आंदोलन करत उभे असता तिथे त्याच घोळक्यात अशा कित्येक आया बहिणी आपल्या आयुष्यातील अगदी जवळच्या नराधमाकडून रोजच असे अत्याचार सहन करत असतात..कोणी समाजाच्या भीती पोटी तर कोणी स्वतःच्या मुलांसाठी हे सगळं मुकाट सहन करत असतात…

मी असं म्हणत नाही की सगळेच पुरुष वासनेने बरबटलेले असतात… ह्या जगात अजूनही अशी माणसं आहेत ,असे पुरुष आहेत जे आपल्या घरातील, आजुबाजूच्या अशा सर्वच स्त्रियांचा आदर करतात..आणि अशा घरातील लक्ष्मी सुखी असते..हसत असते..अशा घरात नंदनवन नांदते… पण असं चित्र खूप कमी ठिकाणी पहायला मिळत..

महिला दिनाचे औचित्य साधून मला अजून एक मुद्दा मुद्दामून मांडावासा वाटतो.. असं म्हणतात की स्त्री जसं सर्व निर्माण करू शकते तशी सर्वाचा विनाशही करू शकते…जिथे आदिशक्ती आहे तिथे कैकयी, शूर्पणखा सारख्या स्त्रिया सुद्धा असतातच की…जिथे एका स्त्रीच्या मागे दुसऱ्या स्त्रीने खंबीरपणे उभं रहाव तिथे एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या विरोधात उभी राहिलेली युगांयुगे पहायला मिळाली आहे. ह्या कलियुगात अशी सुद्धा एक स्त्री पहायला मिळते जी नाती, नीती, संस्कार विसरून एक वेगळ्याच धुंदीत व्याभिचार करायला लागली आहे…समाज बदलत गेला तसं त्या स्त्रीचं वागणं बोलणं,देखील बेढब होत गेलं..आणि मग तिच्या त्या तराजू मध्ये घरातील संस्कारी स्त्री सुद्धा जोखली गेली..

एक स्त्री अशी असते जी मातीतून सोनं उगवते..ती आपल्या सोबत असलेल्या सर्वांचा पुढे घेऊन जाते..ती असते अन्नपूर्णा, ती असते दुर्गा..ती असते उन्हातली सावली,अंधारात उजळणारी प्रकाशाची पणती..खचलेल्या मनाला मिळणारी हिम्मत तीच असते…दमलेल्या शरीराला मिळणारा मायेचा विसावा ही स्त्रीचं असते.ती असते खंबीर आपल्या लेकरांना सांभाळायला..आलेल्या वादळांना अभेद्य पर्वताप्रमाणे तोंड द्यायला ती असते…ती स्त्री आदिशक्ती ..पावित्र्याची मूर्ती..आदिशक्तीला तुम्ही कधी पाहिलं आहे का?ती आपल्या अष्ट भुजांनी सुदर्शन,परशु, त्रिशूळ, तलवार, आणि अशी अनेक आयुधं घेऊन उभी असते…ही एवढी सगळी शस्त्र,अस्त्र घेऊन उभ्या असणाऱ्या माझ्या आदिमायेची शक्ती किती अपार असेल.. तिचं पावित्र्य स्फटिकाप्रमाणे चमकणार अगदी तेजोमय असेल. ही स्त्री एक अस्मिता आहे,ही स्त्री प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक आहे.ही स्त्री आहे त्यागाची मूर्ती…

अशा ह्या दोन स्त्रिया..एक संस्कृती आणि एक विकृती..आजकाल विकृती प्रत्येक घराच्या अंगणात..प्रत्येक माणसाच्या मनात वाढू लागली आहे.आणि संस्कृती…संस्कृती तिचं वास्तव्य गडद अंधाऱ्या खोलीत कुठेतरी लोप पावू लागलं आहे…आता तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमच्या घरात संस्कृती हवी की विकृती…आणि जर संस्कृती हवी तर तिला सन्मान द्यायला शिका नाहीतरी तिची विकृती व्हायला वेळ लागणार नाही…

ज्या दिवशी ह्या स्त्रीचा आदर होईल सन्मान होईल.स्त्रीकडे जेव्हा एक नातं म्हणून नाही तर ती स्त्री म्हणून पाहिलं जाईल…आणि मुख्य म्हणजे जेव्हा स्त्रीजन्म व्हावा, तिच्यावर होणारे अत्याचार कमी व्हावेत म्हणून मोर्चा काढणे,आंदोलने करणे,पथनाट्य सादर करण्याची..गरजच वाटणार नाही..तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल..असं मला वाटतं…

error: Content is protected !!