✒️ चिन्मय श्रीराम घोगळे / प्रतिबिंब
कोकण… कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू… कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, इथली संस्कृती आणि मधाळ मनाची कोकणी माणसं.
“कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी “
या गाण्याच्या ओळी तर फार प्रचलित आहेत. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना पाहता, कोकणचं हे चित्र हळूहळू बदलत चाललं आहे. ‘ बीडचा बिहार होतोय ‘ म्हणता म्हणता आपला कोकण देखील त्याच दिशेने वाटचाल करतोय की काय ? असा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही.
अलीकडेच झारापला पर्यटकाला झालेल्या मारहाणीमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता. ज्या जिल्ह्याला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा बनण्याचा बहुमान मिळाला आहे. त्याच जिल्ह्यात पर्यटकाला मारहाण होणे म्हणजे लांच्छनास्पद आहे. यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनंतर कुडाळमध्ये शिवजयंतीच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला देखील एका तरुणाकडून विरोध करण्यात आला होता. अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रातच विरोध होणं म्हणजे जिल्ह्यासाठी दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.
कुडाळमधील ही घटना ताजी असतानाच भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी सिंधुदुर्गच्या पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये एका विशिष्ट समाजाच्या परप्रांतीय तरुणाकडून देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. अखेर आ. निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर त्या परप्रांतीय तरुणासह त्याच्या कुटुंबाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. त्याच मालवण तालुक्यातील एका गावात विशिष्ट समाजाच्या परप्रांतीय व्यक्तीला अनधिकृत कागदपत्रे देऊन त्याला त्या गावचा नागरिक बनवण्यात आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
या घटनेनंतर महिन्याभरातच ओसरगावमध्ये विवाहितेचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न होतो. जिल्हावासिय ही भयावह घटना विसरण्याचा प्रयत्न करत असतानाच कुडाळ तालुक्यातील कवठी येथे पुन्हा एका व्यक्तीचा खून होतो. हे घडल्यानंतर शांतताप्रिय असलेल्या आपल्या जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय ? असा प्रश्न पडतो.
देवगड तालुक्यातील सौंदळे या गावात एकावर पत्नीसमोरच धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. तसेच मालवण तालुक्यातील पराड या गावात पतीकडून पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
काल परवा तर वैभववाडीत सलूनमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराला थेट दुकानात घुसून मारहाण करण्यात आली. यावेळी कशाचीही पर्वा न करता कायदा थेट हातात घेण्यात आला. कहर म्हणजे या दुकानाच्या मालकीणीने याबाबत तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले असता पोलिसांकडून देखील तक्रार दाखल करण्यात दिरंगाई केली जात होती. पोलिसांकडून सर्वसामान्य माणसांना अशी वागणूक मिळत असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटना पाहता सुसंस्कृत व शांतताप्रिय असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढी अशांतता का बरं पसरली असावी ? या प्रश्नाचे उत्तर माणसाची वाढत चाललेली राक्षसी महत्त्वाकांक्षा, जीवघेणी स्पर्धा यांच्यामुळे निर्माण होणारा स्वार्थ व मत्सर, वाढते राहणीमान यामध्ये सापडते. काही दिवसांपूर्वी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अख्खा महाराष्ट्र हादरला. ” बीडचा बिहार होतोय “असे स्वर सर्वत्र उमटू लागले. परंतु गेल्या काही दिवसांत सिंधुदुर्गात घडलेल्या घटनांवर मंथन केल्यास ” सिंधुदुर्गचा बिहार होतोय का ? ” असा प्रश्न पडू लागला आहे. वरील सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. तसे न झाल्यास वरील वाक्य सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही एवढं मात्र नक्की!













