शब्दांकन =सायली राजन सामंत, नेरुर कुडाळ, बी. ए. एल.एल.बी स्टुडन्ट✒️
पैशाची उधळण करत मोकाट हौस मौज करण आणि डीजेच्या तालावर बर्थडेला मोकाट होऊन नाचणं म्हणजे प्रेम नव्हे,तर सुख दुःख जाणून घेत प्रसंगाच गांभीर्य लक्षात येताच आपल्या जोडीदाराच्या सहकार्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभं रहात ते खरं प्रेम.प्रेम हे आंधळं असत अस अनेकजण आवर्जून सांगतात त्या मताशी मी सहमत नाही कारण आंधळं होऊन केलेल प्रेम जीवनाची राख रांगोळी करतं आणि ज्यावेळी चूक लक्षात येते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.प्रेमभंगाचा धक्का जिव्हारी लागल्यामुळे काही जणांना आत्महत्या केल्यावाचून गत्यंतर नसते,पण डोळस दृष्टिकोन ठेऊन केलेल प्रेम जीवनाला उत्कर्षाकडे घेऊन जात,असं डोळस दृष्टिकोन ठेऊन केलेलं प्रेम समाजात मान,सन्मान,प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरत. तुम्ही ज्या क्षेत्रात करिअर करू इच्छिता त्या क्षेत्रात सुद्धा तुम्हाला सहजच प्रतिष्ठा मिळून जाते .असं प्रेम व्हॅलेंटाईन वीक पुरतं मर्यादित न रहाता जीवनात कर्तृत्वाच्या अथांगतेच आणि उत्तुंगतेच शिखर गाठून संपूर्ण जीवन समृद्ध करत.पण आंधळं होऊन केलेल्या प्रेमामुळे समाजातील आपली पत क्षणार्धात चिल्लर होऊन जाते. नेमक हेच आंधळं होऊन व्हॅलेंटाईन वीक च्या दिवशी गुलाबपुष्प देत प्रेमाच्या आना भाका घेणाऱ्या तरुणाईने समजून घेण सध्याच्या काळाची गरज बनलेली आहे.मुळात हा मुद्दा आज मांडण्याच कारण म्हणजे सगळ्या तरुणाईचा लाडका फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन वीक सुरु झालाय ना…. या महिन्यात तरुण असो तरुणी असो तारुण्यमुळे प्रत्येकाची मन ही प्रेमाप्रती चेतीत झालेली असतात, एकमेकांबद्दल आकर्षित झालेली असतात. तारुण्याच्या बहरामुळे ना- समज मुलं स्वतःला रोमिओ जुलीयेट समजत एकमेकांना गुलाबपुष्प आणि महागडी गिफ्ट देत चित्रपटातील हिरो हिरोयीनी जशा प्रेमाच्या आना भाका घेतात तशाच आना भाका घेत व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेम साजर करतात.
मला काल एक मुलगा बस स्टॅन्ड वर समोरून येताना दिसला.तो आपल्या मित्राला सांगत होता. अरे यार आपला फेब्रुवारी महिन्यातला सण जवळ आलाय ना.त्या दोन मुलांच ते बोलण ऐकून माझ्या बाजूला बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एक पन्नास पंचावन्न वर्षांच्या काकूंनी सटकन मला विचारलं अगो चेडवा फेब्रुवारी महिन्यात हयतो पोरगो सांगता ना तो येदो मोठो खयचो गो सण? त्या काकूंच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं अहो काकू फेब्रुवारी महिना आलाय ना त्या महिन्यात व्हॅलेंटाईन वीक येतो.हा संपुर्ण आठवडा तरुण आणि तरुणी प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा करतात. म्हणून यांना जोर आलाय. त्यावरती अनुभवाची शिदोरी असलेल्या त्या काकू सटकन मला सांगून गेल्या कसला मेल्यांचा भंगला प्रेम.आजून नाय मेल्यांच्या कमवचो पत्तो आणि प्रेमवीर बनान चेकळानं बोकाळतत मेले.पिक्चरात आणि सिरीयल मध्ये बघतत ना गरीबाचो पोरगो आणि श्रीमंताची पोरगी प्रेमात पडतत आणि पळानं जावनं लगीन करतत तेवढा भंगला सोप्या प्रेम आसता कायगो? मुळीच नाय. कारण दिसता तसा नसता, त्यामुळे आंधळा होवन केल्ला प्रेम फसता.अगो चेडवा सगळी सोंगा घेवंक येतत पण पैशाचा सोंग मात्र घेवंक येणा नाय.आणि ज्यावेळी पैशाची गरज भासता त्यावेळी भीक मागाची पाळी येता हेंच्यावर.मगे व्यसनाच्या अधीन जावन मारामारी आणि कुटाकुटी, त्यामुळे पत्याचो बंगलो कोसळाचो तसो प्रेम साजरा करताना घेतलेल्या प्रेमाच्या आना भाकांचो इमलो क्षणार्धात कोसाळता मगे रडान काय उपयोग.बाय मालवणीत एक म्हण आसा कशात नाय काय आणि फाटक्यात पाय.चेडवा हल्लीच्या काळातले नुसते पोरगेच दोषी नाय आसत तर पोराय खुळावलीत. चांगल्या चांगल्या घरातली पोरा चांगले कर्तबगार पोरगे सोडून सोरेकारांका माळ घालून मोकळी होतत.आणि मगे कर्मान गांजावतत.कसला मेल्यांचा भंगरी प्रेम.त्या काकू 5 मिनिटाच्या बोलण्यात चक्क अनुभवाच कुंभच रीतं करत खऱ्या वास्तवाच दर्शन घडवत निघून गेल्या. माझी एसटीची बस यायला अजून खूप वेळ होता.आणि ते दोन मुलगे सुद्धा बसची वाट बघत चर्चा करताना एकमेकांना सांगत होते प्रयत्न सोडायचा नाही. बघूयात येणाऱ्या व्हॅलेंटाईन वीक मध्ये लागला तर लागला चान्स. एखादं दुसरी पोरगी पटली तर पटली. आपल्याला कुठे त्या पोरींबरोबर लग्न करायच आहे.फक्त जीवाची मजा करायची. तेवढीच ग्रुप मध्ये आपली कॉलर टाईट होईल.आणि ते दोघे एकमेकांची टाळी घेत,टाळी देत हसू खिदळू लागले.आणि माझ मन मला सांगू लागलं अरेरे…अशा संधीसाधू मुलांच्या नादी चांगल्या घरातील मुली आंधळं होऊन प्रेम करतात आणि व्हॅलेंटाईन वीक साजरा करत स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात.याबाबतीत त्या काकूंनी सांगितल्या प्रमाणे मुलींना सुद्धा सभ्य म्हणता येणार नाही. नवरात्र उत्सवात जशा विविध रंगाच्या साड्या बदलल्या जातात ना तसे बॉयफ्रेंड बदलण्याच फ्याड सध्या मुलींमध्ये आलेलं आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी जशी बस बदलावी लागते तसा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बदली करण्याचा सध्याच्या घडीला जणू काही ट्रेंडच सुरु झाला आहे. सार काही अजब आणि गजब. प्रेमाने येवढी खालची पातळी गाठलेली पाहून खुप वाईट वाटलं. भविष्यात संधीसाधू प्रेमाच्या संकल्पनेखाली अजून किती जणांची जीवनं उध्वस्त होतील या कल्पनेन मन अगदी हेलावून गेलं. प्रेम करण हा गुन्हा मुळीच नाहीये,पण आपण केलेलं प्रेम हे भविष्यात विश्वासघातकी तर ठरणार नाही ना हे दूरदृष्टीने हेरत जे तरुण तरुणी डोळसपणे प्रेम करतील त्यांच्या संपूर्ण जीवनाला पारिजातकासारखा बहर येईल आणि त्यामुळे त्या मुला मुलींच्या आई वडिलांना आपली मुलं सुखात आहेत हे पाहून अलौकिक आनंद हा झाल्याशिवाय रहाणार नाही. हे वास्तव त्रिवार सत्य आहे.आपण निवडलेला साथीदार कोट्याधिशाचा मुलगा नसला तरी चालेल पण तो प्रतिष्ठित घरातला असावा.समाजात त्याची आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पत असावी. ज्या क्षेत्रात तो करिअर करू पहात आहे त्या क्षेत्रात तो मुलगा लौकिक प्रस्थापित करणारा असावा. मुलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुलगी गरीबा घरची असली तरी चालेल पण ती संस्कारसंपन्न असावी.त्या मुलीत सुखदुःखात खंबीर साथ देण्याची मनोवृत्ती असावी. या सर्व अतिमहत्वाच्या पैलूना अंगीकारात जे मुलं मुली प्रेम करतात त्यांच प्रेम हे चिरकाल टिकतं कारण लाखो क्षण अपूर्ण पडतात आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी पण तारुण्यात आंधळं होऊन आपण केलेली एक चूक कारणीभूत ठरते आपल संपूर्ण जीवन दिशाहीन करण्यासाठी.हे गमक जाणून घेण्याची काबिलीयत म्हणजेच निर्णय क्षमता सध्याच्या युवक युवतींमध्ये यावी हीच आजपासून सुरु होणाऱ्या व्हॅलेंटाईन वीक च्या निमित्ताने मनःपूर्वक प्रार्थना..













