मुंबई: राज्यातील सरकारी शाळा जिथे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या होती, त्या शाळांमध्ये बीएड आणि डीएडधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे.राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नुकताच एक शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार आता सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएडधारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.
काय आहे नवा निर्णय?
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने नियमित शिक्षक आता पुन्हा या शाळांना शिकवणार आहेत2022 सालच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. याच कारणामुळे 2024 च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल असा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.













