जळगाव: जळगावमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट खाली उडी मारली. यात काही प्रवासी समोरून येणार्या रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले आहेत.
नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात कसा झाला, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी अपघाताला आपत्कीलन साखळी (अलार्म चेन पुलिंग) कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.रेल्वे अधिकाऱ्यांकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी यांनी पत्रकार परिषदेत अपघात कसा झाला, याची माहिती दिली. ते म्हणाले, जळगाव रेल्वे स्थानकातून दुपारी चार वाजता पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे निघालेली. पाचारो रेल्वे स्थानकाजवळ ही गाडी आल्यानंतर आपत्कालीन चेन ओढण्यात आली. त्यामुळे गाडी थांबली. त्यानंतर गाडीतील प्रवासी खाली उतरले.पुष्पक एक्सप्रेस ज्या ट्रकवर थांबली, त्याच्या शेजारच्या ट्रॅकवरून बेंगलुरूवरून कर्नाटक एक्सप्रेस जात होते. पुष्पक एक्सप्रेसमधून उतरलेले काही प्रवासी या ट्रकवर उभे होते. त्यामुळे कर्नाटक एक्सप्रेसने काही प्रवाशांना धडक दिली, अशी माहिती नीला यांनी दिली आहे. चेन पुलिंगनंतर अचानक थांबल्यानंतर चाकाजवळून ठिणग्या उडल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशी भीतीने खाली उतरल्याचे काही प्रवाशांकडून सांगितले जात आहे.दरम्यान, अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच 5 ते 7 प्रवासी जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. रेल्वेकडे अद्याप याबाबत अधिकृत माहिती नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगितले.













