दोन महिलांचा मृत्यू; तर तिघे गंभीर जखमी
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. यात थार कारचा चक्काचूर होऊन दोन महिला ठार झाल्यात. तर तिघे गंभीर जखमी झाले असून गोवा सालीगाव गिरी येथून कणकवली भिरवंडे येथे जात असताना हा अपघात घडला. यातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जीए-०३-एएम-८४७८ क्रमांकाची थार कार हायवेवरून नेमळे मार्गावरून कणकवली येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. वाहनाचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन धडकली. या अपघातात श्रीमती नानोडकर (वय ४३, रा. गिरी- गोवा), विलासिनी सातार्डेकर (वय ५३, रा. भिरवंडे-कणकवली) गंभीर जखमी झाल्या. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपचारा दरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर चालक सनी नानोडकर (वय ४०, रा. गिरी गोवा), उज्वला कांबळी (वय ५०, रा. गिरी गोवा), पांडुरंग नानोडकर (वय ६५, रा. गिरी गोवा) हे जखमी असून उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा- बांबोळी येथे हलविण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रूग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिकेने रुग्णांना हलविण्यात आले. या अपघातग्रस्तांवर प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत, परिचारिका श्रीम. गोसावी, श्रीम. नाईक आदींनी प्राथमिक उपचार केले. तर उपचाराअंती दोन महिलांना मृत घोषित करण्यात आले.
नेमळे येथे घडलेल्या या अपघातावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक, निलेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस व नेमळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मतदतकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, शैलेश नाईक, रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे यांनी तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी यांच्याकडून अपघातग्रस्तांच्या कटंबाला धीर देत मदत करण्यात आली.


Subscribe










