अधिकाऱ्यांची मनमानी आणि हालचाल नोंदवही कोरी!
कुडाळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कुडाळ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासकीय कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कुडाळ-नेरूळ-मालवण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला असून, कार्यालयाची हालचाल नोंदवही (Movement Register) २०२४ पासून कोरी असल्याने विभागाच्या पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कामगारांच्या जीवावर काम, अधिकारी गायब
कुडाळ-नेरूळ रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू असताना, ठेकेदाराचे कामगार काँक्रीट भरत होते. नियमानुसार, या महत्त्वाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी, म्हणजेच जेईई पाटोळे, उपस्थित असणे बंधनकारक होते. परंतु, त्यांच्या जागी केवळ एका चतुर्थश्रेणी कामगाराला तिथे नेमण्यात आले होते. कामाच्या ठिकाणी एकही बॅरिकेट नसताना आणि वाहनांची सतत वर्दळ सुरू असताना, सुरक्षेचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात होते. चतुर्थश्रेणी कामगाराने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना साइटवर बोलावले असता, ‘येतो’ असे सांगूनही ते वेळेवर पोहोचले नाहीत. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर कुणाचेही नियंत्रण नव्हते. रस्त्यावरचा चिखल आणि पाणी न काढताच त्यावर काँक्रीट टाकले जात असल्याने हे काम किती काळ टिकेल, याबाबत जनतेत संशय व्यक्त होत आहे.
हालचाल नोंदवही कोरी, ‘गेले कुठे?’ या प्रश्नाचे उत्तर नाही
या संदर्भात माहिती घेण्यासाठी जेव्हा कुडाळ कार्यालयात संपर्क साधण्यात आला, तेव्हा संबंधित अधिकारी ‘साइटवर गेले आहेत’ असे सांगण्यात आले. परंतु, ते नेमक्या कोणत्या साइटवर गेले आहेत, याची कोणतीही नोंद कार्यालयात नव्हती. कार्यालयाची हालचाल नोंदवही तपासली असता, २०२४ पासून त्यात कोणतीही नोंद केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. याचाच अर्थ, गेल्या दीड वर्षात कुडाळ PWD मधील अधिकारी कामावर कुठे गेले, याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि नियंत्रण राखण्यासाठी हालचाल नोंदवही अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, कुडाळ PWD मध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे.
जनतेच्या मनात संतापाची लाट
शासकीय अधिकारीच असा मनमानी कारभार करत असतील, तर विकासकामे वेळेवर आणि योग्य दर्जाची कशी पूर्ण होतील, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. एकीकडे जनतेच्या पैशातून विकासकामे सुरू आहेत, तर दुसरीकडे अधिकारी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास टाळाटाळ करत आहेत. या प्रकारामुळे केवळ रस्त्याच्या कामाचा दर्जाच खालावलेला नाही, तर शासकीय कार्यालयातील कामकाजावरचा जनतेचा विश्वासही डळमळीत झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, कुडाळ-नेरूर रस्त्याच्या कामाची दुर्दशा आणि विभागाचा निष्क्रिय कारभार भविष्यातही असाच सुरू राहील अशी भीती व्यक्त होत आहे.