काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आज मालवणातील मुस्लिम बांधवांनी तहसील प्रशासनाला निवेदन सादर करत या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभे आहोत, या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली.
यावेळी हसरत खान, जाबीर खान, सलीम खान, बाबा मुकादम, झहीर शेख, फारुख मुकादम, शाइद बांगी, बक्तियार खान, कैसर पठाण आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निर्दोष नागरिकांबद्दल आमच्या मुस्लीम समाजातर्फे तीव्र शोक व्यक्त करत आहोत. हा हल्ला अत्यंत भ्याड, अमानवी आणि देशाच्या शांततेस बाधा आणणारा आहे. हिंसक आणि मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या कृत्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. आमचा मुस्लिम समाज नेहमीच शांतता, सद्भाव आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या बाजूने उभा राहिला आहे व यापुढेही राहील. भारताचे नागरिक म्हणून आम्ही सर्वधर्मीय लोक एकत्र आहोत आणि अशा हिंसक कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे. याबाबत प्रशासनाच्या व सरकारच्या योग्य ती कारवाई करण्याच्या निर्णयास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभा आहे आणि अशा घटनांचा तीव्र निषेध करतो. राज्य व केंद्र शासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम बांधवांनी या निवेदनातून केली.