शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १०० शाळांना देणार मंत्री प्रत्यक्ष भेट
पुणे: मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरूवात होण्याच्या पहील्या दिवशी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १०० शाळांना भेटी देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेचे कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, सोयी-सुविधा यांची तपासणी करणार आहेत.या माध्यमातून शाळांची एकप्रकारे झाडाझडतीच होणार आहे.
या उपक्रमाबाबत संबंधित प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नियोजन करावे लागेल. यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रमाची आखणी करावी लागणार आहे. समाज, पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करणे व बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठीच शाळांना भेटी देण्याचा उपक्रम राबविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या यंत्रणेत कोणाचा समावेश?
शालेय शिक्षण मंत्री ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधिनस्थ विविध विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच जिल्हा स्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी यांनी जिल्ह्यातील १०० शाळांना भेट देण्याचे नियोजन करावे लागणार आहे.शाळेस भेट देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्राम पंचायत सदस्य, सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल, याबाबत आवश्यक उपाययोजना सुचविण्याची प्रयत्न करावे लागतील, असे शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव विजय भोसले यांनी स्पष्ट केले आहे.













