अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी – जिल्हाधिकारी अनिल पाटील
सिंधुदुर्ग : आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. परीसरात सुरू असणाऱ्या तसेच बंद पडलेल्या कंपन्यांना नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीची मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.
नार्को कोऑर्डीनेशन सेंटरची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीव्दारे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी तसेच सागरी सुरक्षा दलाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. अंमली पदार्थापासून तरूण पिढीचे रक्षण होणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. परीसरातील सुरू असणाऱ्या तसेच बंद पडलेल्या कंपन्यांना नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही करावी. कस्टम विभाग यांनी वेंगुर्ला रेडी समुद्र किनाऱ्यांवर प्रभावीपणे पेट्रोलिंग करुन कोणतीही अंमली पदार्थाबाबत बाबत निदर्शनास आल्यास पोलिस विभागाला कळवावे. अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी सर्व विभाग यांनी समन्वय ठेवावा. शाळा, महविद्यालय तसेच आठवडी बाजारांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परीणामाबाबत माहिती द्यावी. तसेच विविध् माध्यमाव्दारे जनजागृती करावी असेही ते म्हणाले.













