शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती डिजिटल स्वरुपात एकत्र करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

राज्यगितासोबत अजूनही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा

मुंबई : १०० दिवसांत करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि शाळा व शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी डिजिटल स्वरूपात एकत्रित करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता

प्रधान सचिव रणजीत देओल यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या आराखड्याची माहिती दिली.शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे.शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी शाळा आणि शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा. पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास राहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले आहे. ही योजना सुरू राहावी, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा. यासाठी सर्व मंत्री, सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा. समूह शाळा आवश्यक बाब असून कमी विद्यार्थीसंख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ समजावून सांगा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले?

राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार

सर्व शाळा/अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅपिंग करणार

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२५ – २६ पासून लागू करणार

प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा पंतप्रधान श्री शाळा म्हणून विकास करणार

विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार

शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करणार

शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबविणार

शाळा परिसर आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, सीबीएसई पॅटर्नचा अंगिकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे,

एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यावर भर देणार आहोत. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या आदर्श शिक्षकांच्या प्राविण्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

error: Content is protected !!