सिंधुदुर्ग जिल्हासह कोकणातली कोणत्या जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही असे पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकरवी जाहीर करून घ्यावे
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात सुद्धा काही गावातील स्थानिकांनी या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविला. सदर अणुऊर्जा प्रकल्प विरोधात मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रक्षोभ उसळला हे पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत अणुऊर्जा प्रकल्प अथवा कोकणच्या पर्यावरणाला धोका निर्माण होईल असा कोणताच प्रकल्प प्रस्तावित नसल्याचे जाहीर केले. परंतु काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सारख्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांसाठी काही खाजगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट करताना जागा निश्चित केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी मधील जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्याकरिता पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री या नात्याने प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसेच कोकणातील कोणत्याच जिल्ह्यांमध्ये होणार नाही असे मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करून घ्यावे.अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.


Subscribe










