शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांचा इशारा
मुंबई- गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे चुकीच्या पद्धतीने मिडलकट ठेवण्यात आला आहे.या मिडलकटमुळे आतापर्यंत सात ते आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला. हा मिडलकट बंद करून त्याठिकाणी सर्कल किंवा उड्डाण पूल उभारावे अशी मागणी झाराप पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्याकडे वारंवार करण्यात आली.निवेदनेही दिली परंतु मुकेश साळुंके यांनी याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले. या मिडलकटमुळे मंगळवारी पुन्हा याठिकाणी अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दवी मृत्यू झाला तेव्हा ग्रामस्थांनी महामार्ग अडवून धरला होता. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक देखील याठिकाणी उपस्थित होते. यावेळी वैभव नाईक यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारला, याआधीही वैभव नाईक यांनी महामार्गावरील खड्डयांप्रश्नी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यामुळे वैभव नाईक यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर मुकेश साळुंके यांनी अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुकेश साळुंके यांच्या जातीचा अपमान होईल असे कोणतेही वक्तव्य वैभव नाईक यांनी केलेले नाही मी त्याठिकाणी स्वतः उपस्थित होतो. जर जाब विचारला म्हणून वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात असेल तर झाराप येथे चुकीचा मिडलकट ठेवून शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा झाराप पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा महामार्ग अडवून जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी दिला आहे.

Subscribe










