कणकवलीत चोरट्यांचा धुङ्काकूळ सुरुच

कणकवली शहरातील रात्रभरासाठी बंद घर चोरट्यांनी फोडले

दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

कणकवली : कणकवली शहर परिसरात चोर्या, घरफोड्यांची जणू मालिकाच सुरु होत आहे की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. चार -पाच दिवसांपूर्वी कलमठ – बिडयेवाडी येथे चार बंगले फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरणारे चोरटे अद्याप मोकाट असतानाच शनिवारी रात्री चक्क कणकवली शहरातील कनकनगर येथील सौ. समृद्धी मिलिंद कोरगांवकर (३२) यांचे जेमतेम एका रात्रीसाठी बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी घरातील कपाटातून सहा तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दिड तोळ्यांची सोन्याची चेन व अन्य काही वस्तू मिळून साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरला. तर परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये एक चोरटा दिसून आला असून ती वेळ रविवारी रात्री ११.२०वा . सुमारासची आहे. समृद्धी यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती समजल्यानंतर कणकवली पोलिसांसह, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ्यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, चोरट्यांचा काहीचा छडा लागू शकलेला नाही. अर्थात बरेच महिने शांत असलेले चोरटे पुन्हा एकदा सक्रीय झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. चोरटे लवकरात लवकर जेरबंद व्हावेत व कणकवली घरफोड्यामुक्त व्हावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

केवळ रात्रभरासाठी घर होते बंद

कनकनगर येथे समृद्धी कोरगांवकर यांचे कौलारू घर असून तेथे त्या पती, मुलगा, सासरे यांच्यासह राहतात. शनिवारी समृद्धी यांचे पती, सासरे, मुलगा मालवण येथे गेले होते. तर समृद्धी आरोग्य कर्मचारी असल्याने रात्री ड्युटीवर गेल्या होत्या. त्यामुळे शनिवारी सायंकाळनंतर त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी समृद्धी यांचे घर फोडले. तर रविवारी सकाळच्या सुमारास घरी दाखल झाल्यानंतर समृद्धी यांना ही घरफोडी निदर्शनास आली.

साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरीस

समृद्धी यांनी पाहीले असता, चोरट्यांनी कुलूप तोडण्याच्या भानगडीत न पडता चक्क कडीकोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडला होता. चोरट्यांनी घरातील सर्व कपाटे अस्ताव्यस्त केली होती. परिणामी कपडे व इतर साहित्य इतस्ततः पसरले होते. विशेष म्हणजे घरातच एका ठिकाणी ठेवलेली चावी चोरट्यांना सापडली. त्याच चावीच्या सहाय्याने चोरट्यांनी घराच्या एका कपाटामध्ये ठेवलेले मंगळसूत्र व चेन चोरून नेली. तर लहान मुलाची चांदीची साखळी, गणपतीची चांदीची मूर्ती अशा वस्तूही चोरट्यांनी चोरल्या.

पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती समजताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती जगताप, उपनिरीक्षक शरद देठे, महेश शेडगे, हवालदार मिलिंद देसाई, पांडूरंग पांढरे, राजाराम पाटील, अमित खाडये, सागर जाधव, पांडूरंग कळंत्रे आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. काही वस्तूंचा वास दिल्यानंतर श्वान परिसरात काहीसे घुटमळत राहिले. मात्र, चोरट्यांचा मागमूस लागू शकला नाही. दरम्यान ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळ गाठत काही ठसे घेतले.

चोरटा सीसीटीव्हीत दिसला

पंचनामाप्रसंगी पोलिसांनी परिसरातील काही सीसीटीव्ही तपासले. यामध्ये एक चोरटा लोखंडी रॉड घेऊन परिसरात फिरताना आढळला. विशेष म्हणजे घटनास्थळी एक रेनकोट व पिशवीही सापडली आहे. या वस्तू चोरट्याच्याच असून तो विसरून गेला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोरटे स्थानिक असल्याचा अंदाज

दरम्यान चोरटे केवळ दागिने चोरून थांबलेले नाहीत. तर त्यांनी कपाटांमध्ये असलेल्या महागड्या साड्या, फ्रिजमध्ये असलेल्या भाज्या व फळे चोरण्याचाही प्रयत्न केला. घरात साड्या व भाज्या, फळांनी भरलेल्या दोन पिशव्या आढळल्या. या पिशव्या चोरट्यांनीच भरल्या. मात्र, कुणाचीतरी चाहूल लागल्यानंतर ते पळून गेले असावेत, असा अंदाज कोरगांवकर व पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांना फ्रिजमध्ये अंडी सापडली, त्यांची आम्लेट बनवण्याचाही त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे चोरटे सराईत नसावेत तसेच ते स्थानिक असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.

नागरिकांमध्ये घबराहट


कणकवली शहर, परिसर आणि घरफोड्या हे तसे वर्षानुवर्षाचे समीकरण आहे. वर्षानुवर्षे चोऱ्या, घरफोड्या होत आहेत, मात्र किरकोळ अपवाद वगळता चोरटे कधीच सापडले नाहीत. मागील काही महिने चोरट्यांचा उच्छाद थांबल्याने नागरिकही निर्धास्त होते. मात्र, पुन्हा एकदा घरफोड्यांचे सत्र सुरु झाल्याने नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. आता तर पावसाळा सुरु झाल्याने चोरट्यांना जेरबंद करणे हे पोलिसांसमोरही आव्हान बनणार आहे. मात्र, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी व लवकरात लवकर चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

error: Content is protected !!