प्रधानमंत्री आवास योजनेत 50 हजार रुपयांची वाढ

ब्युरो न्यूज: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थींना ५० हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. पूर्वीच्या एक लाख २० हजार रुपयांच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.त्यातील १५ हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत १० एप्रिलपर्यंत एक लाख ६० हजार ५४४ घरकुले बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहेत. पण, अनुदान कमी, मोफत वाळू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याने ५० टक्के लाभार्थींची घरे अजूनही अपूर्णच आहेत. दरम्यान, जिल्हा दरसुचीनुसार २६९ चौरस फूट घरकूल बांधकामासाठी सव्वादोन लाख रुपयांचा खर्च होतो.

प्रत्येक लाभार्थीस मिळणार आता २.०९ लाख रुपये

घरकूल लाभार्थींना आता मूळ अनुदान एक लाख २० हजार रुपये, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ९० दिवसांच्या मजुरीपोटी २७ हजार रुपये व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीसाठी १२ हजार रुपये दिले जातात. आता ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार ५० हजार रुपये वाढीव मिळणार आहेत. असे प्रत्येक लाभार्थीस आता दोन लाख नऊ हजार रुपये मिळतील.

error: Content is protected !!