काय आहेत नवीन वीजदर; जाणून घ्या
ब्युरो न्यूज: महायुती सरकारने आपल्या जाहीरानाम्यात वीजदर कपातीविषयी माहिती दिली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती. यावर १ एप्रिलपासून राज्यात विजेचे नवे दर लागू होणार आहेत. महावितरणकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यात पुढील ५ वर्षे वीजेचा दर कमीच राहणार आहे.
मोफत टीओडी मीटर
घरगुती वीज वापरणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांकडे बसविलेल्या मीटरमध्ये टीओडीची सुविधा नाही. टीओडी सुविधा मिळण्यासाठी वीज ग्राहकाने कोणत्या वेळेला विजेचा वापर केला हे समजणे आवश्यक आहे. तथापि घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणकडून मोफत टीओडी मीटर बसवून देण्यात येणार आहेत.
कसे असतील वीज दर?
महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रति युनिट ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ मध्ये ९० पैसे, २०२८-२९ मध्ये ९५ पैसे आणि २०२९-३० या वर्षात १ रुपया सवलत देण्यात येणार आहे. अशा महितीचे परिपत्रक महावितरणकडून जाहीर करण्यात आले आहे.
भविष्यात स्मार्ट मीटर बंधनकारक
याबाबत कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, ग्राहकांच्या वीज वाढीच्या दबावामुळे महाआयोगाकडे आलेल्या हरकतींवरून वीजदर कपातीचे निर्देश महावितरणला दिले आहेत. दरम्यान जे स्मार्ट मीटर बसवलेले ग्राहक आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. यामुळे भविष्यात स्मार्ट मीटर बंधनकारक होऊ शकते. महावितरणने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सर्वच नाही पण काही ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. अशी माहिती पाटील यांनी दिली.













