कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात बागायती, जंगल, परस बागांना आगी लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घराच्या परिसरात असणाऱ्या काजू बागेला आज (रविवारी) दुपारी १ च्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. मीना ठाकुर यांच्या घरातही ही आग घुसून कपडे जळून खाक झाले. सुदैवाने स्थानिक नागरिक भाऊ मेस्त्री, जयवंत गावडे यांनी तत्काळ धाव घेत आग विजविल्याने पुढील दुर्घटना टळली. ही घटना समजताच उपसरपंच प्रदीप गावडे, शैलेश घाटकर, दिलीप तिवरेकर, पिंटू दळवी, रमण गावडे, नागेश गोडकर, सर्पमित्र प्रसाद गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मागील अनेक वर्षे वेताळ बांबर्डे गावात ऐन मार्च ते फेब्रुवारी या काजू, आंबा हंगामात आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की बागायती, जंगल, परसबाग यांना या आगी जाणून बुजून लावल्या जात आहेत. याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.