सावंतवाडी : सरमळे नदीत मित्रा समवेत आंघोळीसाठी गेलेल्या माजगाव-तांबळगोठण येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. निखिल सूर्यवंशी (वय ४४) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी उशिरा त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, आज सुट्टी असल्यामुळे निखिल हा आपल्या काही मित्रां समवेत सरमळे येथे नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी आंघोळ करत असताना उशीर झाल्यामुळे काही मित्र परतले. मात्र त्याच्यासोबत असलेले काही मित्र त्याठिकाणी आंघोळ करत राहिले. दरम्यान चार वाजण्याच्या सुमारास पाण्यात उतरलेला निखिल अचानक त्या ठिकाणी दिसेनासा झाला. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या त्याच्या अन्य मित्रांनी त्याचा शोध घेतला. परंतू तो मिळून आला नाही. त्यामुळे हा प्रकार बाजूला राहत असलेल्या ग्रामस्थांना सांगण्यात आला. त्यांनी नदीपात्रात शोधमोहीम राबवली. परंतू उशिरापर्यंत त्याचा मृतदेह मिळाला नाही. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल. काही वेळाने माजगाव येथील त्याचे सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
यानंतर तो मृतदेह बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.













