जलजीवन मिशन आराखडा 2 वर्षे कालावधी उलटून देखील अजूनही फक्त कागदावरच…!
मंगळवार 11 मार्च रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर करणार
उपोषण आंदोलन..प्रसाद गावडेंची माहिती
कुडाळ : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ व बेजबाबदार कारभारा विरोधात निषेध म्हणून वेताळ बांबर्डे ग्रामस्थ मंगळवार दि 11 मार्च रोजी उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती ग्रामस्थ प्रसाद गावडेंनी दिली आहे. वेताळ बांबर्डे गावातील जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाण्याच्या योजनांसाठी ठेकेदारास कार्यारंभ आदेश देऊन दोन वर्ष कालावधी उलटून गेला तरी ठेकेदाराकडून चारही योजनांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली नसल्याने गावात योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. वेताळ बांबर्डे गावात जलजीवन मिशन अंतर्गत चार योजना मंजूर असून त्यासाठी 2 कोटी 68 लाख रुपयाच्या कामांना दोन वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.मात्र ठेकेदार व अधिकारी यांच्या अनास्थेमुळे गावात आजपर्यंत एकही 10% सुद्धा काम झालेले नाही. “घराघरात नळ” ही केंद्र शासनाची योजना वेताळ बांबर्डे गावात राबविली गेली नसून पाणी पुरवठा विभागाने वेताळ बांबर्डे वासियांवर मोठा अन्याय केला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी लागे बांधे असल्याने त्यांनीही दोन वर्षात बघ्याचीच भूमिका घेतल्याचा आरोप प्रसाद गावडेंनी करत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व उप अभियंता कुडाळ यांच्या भोंगळ कारभारा विरोधात वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडणार करणार असल्याचे पत्र त्यांनी कार्यकारी अभियंत्याना दिले आहे.













