अपघातानंतर रोखलेला महामार्ग अखेर दीड तासानंतर सुरळीत

सोमवारी तहसीलदार कार्यालयात होणार बैठक

हायमास्ट, रंबलर, पथदिवे यासह अन्य महत्वाच्या मागण्या पूर्ततेसाठी होणार बैठकीत निर्णय

कणकवली : महामार्गावर दुचाकीला धडक देत गोव्याच्या दिशेने जाणारा सिलिका वाळूच्या ट्रकने दोघांना गंभीर जखमी केल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने हळवल फाटा येथे महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. गेले अनेक दिवस वारंवार अपघात होऊन देखील गांभीर्याने उपाययोजना होत नसल्याने ठोस आश्वासन दिल्याशिवाय इथून हालणार नसल्याचा इशारा माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह जमावांनी दिला. अखेर या प्रश्नीं तहसीलदार कार्यालयात हायवेच्या अधिकाऱ्यां सहित सोमवारी बैठक घेतली जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी दिले. व या वेळी हळवल फाटा या ठिकाणी हायमास्ट, महामार्गावर हळवल फाट्यापर्यंत दुतर्फा लाईट तसेच रमलर व आवश्यकतेनुसार स्पीडब्रेकर ही आश्वासने पूर्ण करण्याची ग्वाही द्या तरच आंदोलन मागे घेऊ अशी मागणी केली. अखेर याबाबत हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार कार्यालयात सोमवारी बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल. तर राजापूर येथे हायवेवर स्पीड ब्रेकर घातलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर घाला किंवा अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा अशी मागणी करण्यात आली. तसेच ज्या सिलिका वाळूची वाहतूक केली जात होती त्या संबंधित व्यवसायिकाशी संपर्क साधत या दुचाकी वरील महिला व मुलगा यांच्या अपघातास कारणीभूत ठरल्याने खाजगी दवाखान्यात होणारा खर्च देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. अखेर तब्बल दीड तासाने महामार्ग खुला करण्यात आला. तोपर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा वागदे व जानवली पर्यंत लागल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासहित पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!