कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातला आहे हा जिल्हा म्हणजे आमचं कुटुंब आणि मानतो त्यांच्यामुळे आम्ही विविध पदे भूषवलेली आहेत त्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि आमच्यावर असलेला विश्वास ढळू देणार नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेने आमच्या सोबत काम करून सहकार्य करावे असे आवाहन मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे पोलीस विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सांगितले. तसेच भावी पिढी चांगली घडावी त्यामुळे जिल्ह्यातील सगळे अनैतिक धंदे बंद करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार माजी मंत्री दीपक केसरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पद्मश्री परशुराम गंगावणे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे आदी उपस्थित होते.
या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यामध्ये पोलीस विभागाच्या वतीने हेल्पलाइन नंबरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, पोलीस विभागाने हेल्पलाइनचा जो उपक्रम हाती घेतला तो कौतुकास्पद असला तरी पोलिसांवर असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी पोलीस यंत्रणेने सुद्धा कार्य तत्पर राहिले पाहिजे. आपली विश्वासार्हता कमी होत नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा जिल्हा म्हणजे आमचं कुटुंब आहे त्यांची सुरक्षितता आणि आमच्यावर असलेला विश्वास हा असाच राहिला पाहिजे तर पोलीस यंत्रणेने सुद्धा विश्वासाने काम करणे महत्त्वाचे आहे. पोलीस विभागात काही आंबे सडके असतील तर त्यांना बाहेर काढणे अधिकाऱ्यांचे काम आहे. असे सांगून झारापमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी आहे पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. कारण या जिल्ह्याचे अर्थकारण जसे आंबा, काजू, मासे यावर आहे तसेच ते पर्यटनावर आहे त्यामुळे अशा घटना रोखणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक अग्रवाल यांचे केले कौतुक
या जिल्ह्यामध्ये पोलीस विभाग आणि जनता यांच्यामध्ये संवाद राहावा म्हणून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जी ग्राम संवाद सुरू केला आहे ते कौतुकास्पद आहे. या संवाद चर्चेची सुरुवात शिवापुर सारख्या ग्रामीण भागातून करण्यात आली. यापूर्वी एकही पोलीस अधीक्षक गावापर्यंत गेला नाही. यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. तो खरोखरच वाखाण्याजोगा आहे असे सांगून अप्पर अधीक्षक कृषिकेश रावले हे सुद्धा तपास कामांमध्ये चांगले आहेत पण या सर्वांकडून माझी अपेक्षा एवढीच आहे की, या जिल्ह्यातील जनता तुमच्या कार्यपद्धतीवर समाधानी झाली पाहिजे असे काम करा नक्की पुढील काळात आम्ही कौतुक करू असे सांगितले.
अनैतिक धंद्यांवर कारवाई करा
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ तसेच ऑनलाइन गेमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवून हे सगळे अनैतिक धंदे बंद झाले पाहिजे गुटखा, मटका यांच्यावर कारवाई करा पुढील पिढीही चांगली घडली पाहिजे तर अशा अनेक धंद्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ लेखिका वृंदा कांबळी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हा समन्वयक सिताराम उर्फ दादा कुडतरकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक उर्फ काका करंबेळकर, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांचे विशेष सत्कार यावेळी करण्यात आले.













