प्रेमप्रकरणातून पळून गेलेल्या बहिणीला भावाने २०० फूट खोल दरीत ढकलून संपवलं

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा चुलत भावानेच दरीत ढकलून खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेले व तेथून २०० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली. नम्रता गणेश शेरकर (वय १७ वर्ष) असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून ऋषिकेश तानाजी शेरकर (वय २५) असं आरोपी भावाचं नाव आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेली बहीण काही दिवसानंतर घरी परत आली. त्यानंतर चुलत भावाने तिला डोंगरावर नेलं व तिचे लक्ष नसताना खाली ढकलून दिलं.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी प्रेमप्रकरणातून घर सोडून निघून गेली होती. त्यावेळी तिने घरच्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही शहागड पोलिसांना दिली होती. काही दिवसांनी मुलगी पुन्हा आपल्या घरी परतली. त्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते.

तिच्या काकांनी मुलीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण चुलत भावाच्या मनात ती पळून गेल्याचा राग होता. त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश याने नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला तेथून खोल दरीत ढकलून दिले, त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

error: Content is protected !!