बांदा बाजारपेठेत जादूटोण्याचा प्रकार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बांदा शहराच्या मुख्य बाजारपेठेत, गांधी चौकात अघोरी कृत्य केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, हळद आणि कुंकू ठेवलेले आढळले. आज सकाळी दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी गांधी चौकात जेव्हा काही व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना रस्त्यावर हे विचित्र साहित्य दिसले. टाचण्या टोचलेल्या लिंबांसोबत नारळ, हळद आणि कुंकू ठेवलेले पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि भीती पसरवणारे हे कृत्य कोणी केले, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशा कृत्यांमुळे समाजात गैरसमज आणि भीती पसरते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या घटनेचा तपास करून दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू झालेला नाही.

error: Content is protected !!