व्यापारी महासंघाचा अन्न भेसळ प्रशासनाला सवाल
महासंघाने निवेदनातून उपस्थित केले विविध प्रश्न
कुडाळ : उपहारगृहातून शाकाहारी व मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवण्या कराव्यात असे निर्देश अन्न व औषधी सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र यांनी राज्यातील विविध वर्तमानपत्रातून जाहीर केले. पण त्यातून दूध, अंडी हे पदार्थ शाकाहारी की मांसाहारी? शाकाहारी-मांसाहारी माणसे एकाच टेबलवर बसून जेवू शकतात का, असे काही प्रश्न उपस्थित झाल्याने, अशा प्रश्नांची उकल करून मार्गदर्शन करावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने अन्न व औषधी सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने या बाबतचे निवेदन अन्न व औषधी सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयामध्ये सादर केले. या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष संजय भोगटे, माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये व हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, उपहारगृह आणि विशेषतः कोकणातील छोट्या खानावळी चालकांच्या मनात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.सबब या व्यावसायिकांच्या मनात निर्माण झालेल्या पुढील शंकांचे तपशिलवार निरसन झाल्यास त्या प्रमाणे आपल्या सदर निर्देशांचे पालन करण्यास सोईचे ठरेल.
१)शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत सुस्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे काय? असल्यास ती अन्न व औषध प्रसासना मार्फत सर्व परवानाधारकांना उपलब्ध करून द्यावी.(उदा.अंडी,दूध व दुग्धजन्य पदार्थ, वाईन, अळंबी, कोथिंबीर, मसूर, कांदा, लसूण आदी पदार्थ/मद्य/वनस्पती/कडधान्ये/कंद हे शाकाहारी कि मांसाहारी या बद्दलचा संभ्रम)
२) शाकाहारी व मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवावे म्हणजे नक्की काय? स्वयंपाकघरच स्वतंत्र असले पाहिजे कि फक्त शिजवण्या वाढण्याची भांडीकुंडी आणि माणसे पण वेगवेगळी हवीत किंवा कसे?
३) साठवण व्यवस्था वेगवेगळी हवी म्हणजे नक्की काय?(बहुसंख्या छोट्या खानावळी/पोळीभाजी केंद्रे ही आगे दुकान पिछे मकान अश्या प्रकारेच चालवल्या जातात आणि घरातले स्वयंपाकघर हेच व्यवसायाचेही स्वयंपाकघर असते.अशा वेळी काय करायचे?)
४) एकाच हातगाडीवर/ठेल्यावर तथाकथित शाकाहारी(उदा.पावभाजी) व तथाकथित मांसाहारी (उदा.बुर्जी) विकले जात असल्यास त्यांना दोन गाड्या/ठेले करावे लागतील काय आणि ते शेजारी शेजारी असले तर चालतील काय?
५) एकाच घरगुती फ्रिज(रेफ्रिजिरेटर) मधे अंडी,भाज्या,शितपेयांच्या बाटल्या,दुग्धजन्य पदार्थ, मांस-मासे आदी शाकाहारी व मांसाहारी पदार्थांच्या साठवणूकीची व्यवस्था अधिकृतपणे केलेली असते. हेच फ्रिज सरसकट सर्व खानपान सेवेत वापरात असतात.ही साठवणूक व्यवस्था कायदेशीर कि बेकायदेशीर?
६) एकाच टेबलावर बसलेल्या दोन वेगवेगळ्या ग्राहकांनी एकाचवेळी शाकाहारी व मांसाहारी भोजन मागविल्यास काय करायचे? कि शाकाहाऱ्यांसाठी वेगळी बैठक व्यवस्था सुद्धा अपेक्षित आहे?
७) रेल्वेच्या पॅन्ट्रीकार ना आणि विमानातील खानपान सेवेला पण हाच नियम लागू होणार का?
७) एसटीने दीर्घपल्ल्याचा प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी हे सोबत आपले भोजन घेऊन येतात व ते एस्टी थांब्यावरील खानपानसेवेत (कॅन्टीन) बसून खातात.यात मांसाहारी पदार्थ असल्यास कॅन्टीन चालकाने काय करायचे?
८) हा नियम फक्त उपहारगृह/खानावळींसाठी आहे कि यात बेकरी उद्योगही अभिप्रेत आहे? असल्यास त्यांनी अंडी व तत्सम प्राणीज पदार्थ वापरायचे किंवा कसे?
ज्या प्रमाणे वर्तमानपत्रातून आपण सदर आदेश पारित केले आहेत त्याच प्रमाणे वर उल्लेखित शंकांचे सविस्तर निराकरण आपणाकडून जाहीरपणे झाल्यास ते महाराष्ट्रातील सर्व संबंधित अन्न परवाना धारकां पर्यंत सहजपणे पोहोचेल व आपल्या आदेशाच्या काटेकोर अंमलबजावणीत कोणताही संभ्रम रहाणार नाही. त्यामुळे तशाच प्रकारे प्रयत्न व्हावा ही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.