मंत्री भरतशेठ गोगावले आणि माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि आगामी दिशा निश्चित करण्यासाठी विशेष आढावा व मार्गदर्शन बैठक दिनांक २४ मे २०२५ रोजी , ओरस येथे संपन्न झाली. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री व शिवसेना नेते मा. श्री. भरतशेठ गोगावले, माजी मंत्री व आमदार मा. श्री. दीपक भाई केसरकर, शिवसेना उपनेते मा. श्री. संजय वसंत आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख संजू परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रत्येक तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील शिवसेनेच्या कामकाजाचा आढावा सादर केला. बैठकीत स्थानिक प्रश्न, संघटनात्मक ताकद, महिला व युवक आघाडी यावर सखोल चर्चा झाली.
मा. भरतशेठ गोगावले म्हणाले, संघटना वाढवण्यासाठी गावपातळीवर सक्रिय कार्यकर्ते हेच आपली खरी ताकद आहेत तळागाळातील जनतेसाठी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास शिवसेना पुन्हा एकदा बळकटपणे उभी राहील .
मा. दीपक भाई केसरकर म्हणाले, शिवसेनेचा विचार जनतेच्या मनात रुजलेला आहे. केवळ विकासकामांवर नव्हे, तर जनसंपर्कावर भर देत कार्यकर्त्यांनी विश्वासार्ह नेतृत्व उभं करावं.”
शिवसेना उपनेते मा. संजय आग्रे यांनी सांगितले की, संघटनात्मक काम हेच पक्षवाढीचा पाया आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून, गावपातळीवर शिवसेनेचा विचार आणि काम पोहोचवले पाहिजे. आपली संघटना आता अधिक ठोस कृतीसाठी सज्ज आहे.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, पक्षवाढीसाठी आमदार नितेशजी राणे साहेबांच्या नेतृत्वावर कुडाळ मालवण मध्ये जोरदार संघटना वाढ होत आहे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या धोरणांवर ठाम राहून जनतेशी संवाद साधावा.
जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांच्या अडचणी, स्थानिक समस्या आणि मतदारसंघातील गरजा या गोष्टी लक्षात घेऊन शिवसेना हा पक्ष सामान्य माणसांच्या प्रश्नांवर केंद्रित राहणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या निर्णयप्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा.”
या बैठकीस शिवसेना उपनेते संजय आंग्रे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत जिल्हाप्रमुख संजू परब महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, संजय पडते, अशोक सावंत, दादा साइल, दीपलक्ष्मी पडते, विश्वास गावकर, शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी, किसन मांजरेकर विलास साळसकर यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बैठक केवळ आढावा बैठक न राहता, संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी एक प्रेरणादायी टप्पा ठरली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत पुढील वाटचालीसाठी दिशा ठरवणारी ठरली आहे.













