कुडाळ प्रतिनिधी
आमदार वैभव नाईक आमदारही बनले नव्हते त्यावेळी कोकण विकास कार्यक्रम २००९ अंतर्गत तत्कालीन मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी ओरोस येथे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह विकसित करणे हे काम मंजूर केले होते. त्यानंतर हे नाट्यगृह कुडाळ येथे प्रस्तावित करण्यात आले मात्र याचे फुकटचे श्रेय उबाठा शिवसेनेने घेऊ नये असे भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. तसेच याची वस्तुस्थिती जाणून घ्यावी यासाठी शासनाचे आदेश, परिपत्रके पाहावे नंतर श्रेय घ्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.कुडाळ शहरातील नाट्यकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह, तहसील कार्यालयाजवळील मैदान तसेच महिला व बाल रुग्णालय हे प्रकल्प आपण घेऊन आल्याचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या निवडणूक प्रचार पत्रकामध्ये म्हटले आहे. मात्र याची वस्तुस्थिती वेगळीच आहे महाराष्ट्र शासनाची कॅबिनेट बैठक जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली होती. त्यावेळी कोकण पॅकेज देण्यात आले होते आणि या कोकण विकास कार्यक्रम २००९ अंतर्गत काही विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती त्यामध्ये मालवणी भाषा साता समुद्रा पलीकडे घेऊन जाणारे नाट्यकर्मी मच्छिंद्र कांबळी यांच्या स्मरणार्थ नाट्यगृह मंजूर करण्यात आले होते हे नाट्यगृह सुरुवातीला ओरोस येथे मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर ओरोस येथे नाट्यगृहाची आवश्यकता नसून कुडाळ येथे नाट्यगृह उभारणे सर्व दृष्टीने सोयीचे व फायदेशीर असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महाराष्ट्र शासनाला कळवले होते. त्यानुसार तत्कालीन अव्वर सचिव गीता कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार कुडाळ येथे जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. आणि या पत्रानुसार तत्कालीन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सर्वसाधारण सभेत या नाट्यगृहासाठी जमिनीसाठी सर्वसाधारण सभेचा ठराव घेतला. या नाट्यगृहासाठी राज्य शासन व नगर विकास विभागाचा निधी दिला जात आहे. यामध्ये नगरपंचायतीचा हिस्सा सुध्दा आहे.हे नाट्यगृह नाट्य कलावंत व रसिकांसाठी योग्य पद्धतीने बनले पाहिजे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी कोणतीही प्रयत्न केले नाहीत या नाट्यगृहाच्या रंगमंचाची स्थिती ही मंगल कार्यालयाच्या मंचासारखी आहे आणि यावर सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव तसेच कुडाळ शहरातील नाट्य कलावंत व रसिकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. मात्र यामध्ये कोणतेही बदल करण्यामध्ये आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला नाही. मात्र या नाट्यगृहाचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. ज्या उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माहिती हवी असेल तर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णय साईडवर जाऊन महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय, क्रमांक कोविका- २००९ / प्र.क्र.६/ का-१४२० मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक २५ ऑगस्ट. २००९ हा शासन निर्णय पहावा आणि मग ठरवावं की वैभव नाईक हे २००९ मध्ये आमदार होते की नाही आणि त्यावेळी हे नाट्यगृह मंजूर झाले की नाही. उगाच हवेत बार मारू नये असे सांगून तहसील कार्यालय येथील मैदान, महिला व बाल रुग्णालय याचे श्रेय सुद्धा त्यांनी घेऊ नये याबाबतही माहिती आमच्याजवळ आहे. असे भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.













