परंपरांच्या रूढींची उभारूयात गुढी

शब्दांकन= सायली राजन सामंत,नेरुर कुडाळ,बी. ए. एल. एल. बी स्टुडन्ट. ✒️

छत्रपती शिवरायांचा इतिहास,आणि संत महंतांची पुण्याई लाभलेला आपला वैभवशाली महाराष्ट्र.या महाराष्ट्रात विविध धर्म आणि विविध संस्कृतींची जपणूक केली जाते.विविध धर्मात सर्वश्रेष्ठ मानला जाणारा आपला हिंदुधर्म नवनवीन सणांची जणू काही नांदीच.चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.या दिवशी हिंदू नववर्षाची मोठ्या दिमाखात सुरुवात करण्याची परंपरा अगदी अनादी काळापासून चालत आलेली आहे.हा गुढीपाडवा विजयाचे प्रतीक,संस्कारांच कोंदणं,रितिरिवाजांची मांदियाळी म्हणून साजरा करण्यात येतो.पाडव्यापासून वसंत ऋतुचे आगमन होते.वाईट वृत्तीचा पराभव करून चांगल्या गोष्टींचा अंगीकार करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा.
आपल्या हिंदू धर्मामधील प्रत्येक सण हे अनादी काळात घडलेल्या अर्थपूर्ण कथासारातून उदयास आलेले आपल्या वाचनात येतात.त्याचप्रमाणे गुढीपाडवा हा सण साजरा करण्याच्या अनेक कथा या प्रत्येकाच्या वाचनात आलेल्या आहेतच,पण त्यातील एक अविस्मरणीय कथा म्हणजे प्रभुरामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून आणि लंकाधीश रावणावरती विजय प्रस्थापीत करून आपल्या अयोध्या नगरीत याच दिवशी परतले.त्या अविस्मरणीय कथासाराच्या क्षणाचे वर्णन करताना शाहीर अस म्हणतात ….
आनंदु वो माये,अयोध्या नगरी उत्सवो,
आज आले रामरावो,मोतिया तांदुळ कांडिती बाया,मुखातून गाती वेळोवेळा रामनाम,अजिंक्य होओनी आले अयोध्यापुरा कौसल्यानंदन,धन्यआज दिनू सोनियाचा….
शाहिरांनी सादर केलेल्या या काव्यातून प्रभू रामचंद्र ज्यावेळी अयोध्येत परतले त्या स्वागत समारंभाचा अलौकिक साक्षात्कार प्रत्येकाच्या नजरेसमोर उभा रहातो.एवढंच नव्हेतर ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या शुभमुहूर्तावरच.त्यानंतर खऱ्या अर्थाने सत्ययुगाची सुरुवात झाली. त्या दिवसापासून हिंदू धर्मामध्ये नूतनवर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. यादिवशी विश्वातील तेज,तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि शुभ अशा गुढीच्या रूपाने आपण त्या अधिकाधिक आपल्यामध्ये संचित करण्याचा प्रयत्न करायचा असतो.भगवान विष्णुनी मत्स्यरूप धारण करून शंखासुर नामक दैत्याचा वध केला.तो मत्स्य अवतार चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच.म्हणूनच तर ही गुढी ब्रह्मध्वजा बरोबरच विजयध्वजाचं प्रतीक मानली गेली आहे.
चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुच्या आगमनाला सुरुवात होते.त्यामुळे वातावरणात कमालीचे अमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतात.झाडांची जुनी सुकलेली पान गळून झाडांना नवीन पालवी फुटते.आंब्याच्या झाडांना मोहोर येतो.याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याच्या झाडाच्या पानांचा टाळ बांधला जातो.त्यामुळेच हिंदू धर्मात शुभकार्यात आंब्याचा टाळ बांधण्याची प्रथा अस्तित्वात आलेली आहे.या महिन्यात आयुर्वेदिक औषधी जडीबू्टींच्या झाडांना कमालीचा बहर येतो.याच आयुर्वेदाच प्रतीक म्हणून अंगणी उभारल्या जाणाऱ्या शुभ अशा गुढीला कडुलिंबाची पाने लावली जातात.पूर्वीच्या काळी चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा,मीठ,हिंग,मिरी तसेच इतर आयुर्वेदिक जडीबुटींचे वाटप केल जायच.याच आयुर्वेदिक जडी बुटी मध्ये अनेक आजारांवर मात करायची ताकद असायची.याच आयुर्वेदिक जडीबुटींचा म्हणजेच धन्वंतरीचा उगम समुद्र मंथनातून झाल्याचा पुरावा पोथी पुराणात सापडतो.थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या हिंदू धर्माच्या राठीत वर्षभरात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सर्व सणांचा पुराण कथासारातून उगम झालेला आहे. त्याच पुराण कथासारातील समृद्ध अशा परंपरांची रूढी अथांग आणि उत्तुंग आहे,आणि त्याच परंपरांच्या रूढींची गुढी इतिहास युगात आई जिजाईच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांनी उभारली आणि त्याच गुढीचं पूजन करून पवित्र मानल्या जाणाऱ्या हिंदू धर्माच आम्ही सदैव रक्षण करु अशी शपथ घेतली. अहो हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जगावं कस हे शिवरायांनी आपल्याला शिकवलं आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मरावं कस हे शंभुराजांनी आपल्याला शिकवलं. त्याकाळातील संताजी, धनाजी,बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी, सूर्याजी अशा अनेक मावळ्यांनी धर्मरक्षणासाठी दिलेलं आपल्या प्राणाचं बलिदान कधीच विसरता येणार नाही.त्याचं शौर्यगाथेची कास धरत महाराणी येसूबाई असोत महाराणी ताराराणी असोत किंवा पेशवे किंवा शाहुमहाराज असोत यांनी हिंदू धर्माच्या पवित्र अशा रूढीपरंपरेच्या गुढीला साक्ष ठेऊन आपल्या प्राणाची तमा न बाळगता वेळोवेळी पवित्र अशा हिंदू धर्माचं सदैव रक्षण केल.साधू,संत, महंत,शाहिरांनी सुद्धा त्यांच्या शौर्यगाथेचे पोवाडे आपल्या भजन,किर्तन, प्रवचनातून अनेकवेळा सादर केलेले आहेत.अहो त्याच शौर्यगाथेवरच हिंदू धर्माचा डोलारा सध्याच्या घडीला खंबीरपणे उभा आहे.अहो त्याच हिंदू धर्माच्या राठीत तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो आहोत,आपण किती भाग्यवंत आहोत.आणि म्हणूनच तर मी तुम्हाला सांगू इच्छिते या वर्षीच्या गुढीपाडव्याला आपण आपल्या हिंदू धर्माच्या पवित्र अशा रूढींची गुढी उभारून तीचं पूजन करताना पाश्चात्य देशाच्या संस्कृतीच्या मायाजालात आणि व्यसनाच्या अधीन गेलेल्या युवापिढीला चांगल्या मार्गावर येण्यासाठी परमेश्वराने सुबुद्धी द्यावी अशी मनःपूर्वक प्रार्थना करूयात.कारण प्रत्यक्ष तस घडल्यास समृद्ध अशा हिंदू धर्माची पावित्रता सूर्य चंद्र असे पर्यंत चिरकाल टिकून राहील हे मात्र निश्चित.आणि खऱ्या अर्थाने गुढी पाडवा साजरा केल्याचं पुण्य तुमच्या आमच्या पदरी पडेल.नूतन वर्षारंभाच्या अर्थात गुढीपाडवव्याच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.येणारे नववर्ष प्रत्येकाला भरभराटीचे जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.शुभ गुढीपाडवा.

error: Content is protected !!