पाडव्यात आमरसाचा गोडवा महागणार

यंदा हापूस आंबा उत्पादन फक्त 30%

देवगड: पर्यावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बागायतदार आणि खवय्ये देखील निराश आहेत. यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला वांझ-मोहरामुळे दगा दिला आहे. त्यामुळे ३० टक्के आंबा उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला असून तिसऱ्या टप्प्यातील मोहरही गायब झाला आहे.परिणामी मे महिन्यात सर्वसामान्यांसाठी स्वस्त उपलब्ध होणारा हापूस आंबा यावर्षी मात्र दुरापास्त होण्याची शक्यता आहे. आंब्याची चव यावर्षी महागणार आहे.

मार्च महिना उजाडला तरी देखील एक डझन आंब्याची किंमत १३०० ते १५०० प्रति डझन रुपयापर्यंत आहे. तसेच बाजारपेठेत आवकही कमीच आहे.डिसेंबर महिन्यात मोहर आल्यानंतरचा हा पहिल्या टप्प्यातील आंबा आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा आता २० मार्च ते २० एप्रिल या कालावधीत बाजारपेठेत दाखल होईल. मात्र दुसऱ्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन यावर्षी ३० टक्के झाले आहे. हा दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंबा स्थानिक बाजारात व महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांमध्ये जातो. परदेशातही आंब्याची निर्यात केली जाते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंब्याचा दर जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

error: Content is protected !!