कोणत्या आमिषासाठी नाही फक्त कुडाळच्या विकासासाठी भाजपात !

कुडाळच्या ‘त्या’ सात नगरसेवकांनी केले स्पष्ट…

वैभव नाईकांनी ‘ते’ पुरावे सादर करावेच…

कुडाळ : आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेले सातही नगरसेवक कोणत्याही आमिषाला नाही तर फक्त कुडाळ शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रवेश केला असल्याचे या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं. आम्ही पैशाच्या आमिषाला बळी पडल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर कारावे असे आव्हानही त्यांनी दिले.

महाविकास आघाडीतून भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी शुक्रवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका आफरीन करोल, अक्षता खटावकर, श्रेया गवंडे, सई काळप व ज्योती जळवी आदी उपस्थित होत्या.

किरण शिंदे म्हणाले, कुडाळ शहराचा विकास व्हावा, या दृष्टीने एक मताने आम्ही सर्व नगरसेवकांनी निर्णय घेत भाजपात प्रवेश केलेला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा भाजप प्रवेश केला आहे. मात्र आमच्या प्रवेशाबाबत सध्या ज्या काही चर्चा सुरु आहेत, त्या निरर्थक आहेत. अलिकडेच झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीवेळी आम्हालाही काही मोठी आमिषे होती, मात्र आम्ही त्या आमिषांना बळी न पडता, पक्षाचा विचार करून, पक्ष व महाविकास आघाडीने जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला, त्या उमेदवारालाच आम्ही प्रामाणिकपणे मतदान केले आहे. मात्र आमच्यातीलच एक नगरसेविका फुटल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सई काळप यांचा पराभव झाला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक ज्या ठिकाणी एकत्रित होतो, तेव्हा माजी खासदार विनायक राऊत यांची गटनेते मंदार शिरसाट यांच्याशी फोनवरून चर्चा व्हायची, मात्र राऊत यांची काय चर्चा व्हायची त्याची शिरसाट यांनी आम्हा नगरसेवकांना कोणतीही कल्पना न देता शेवटपर्यंत आम्हाला त्यांनी अंधारात ठेवले. नगराध्यक्षपदी ठाकरे शिवसेनेचा नगराध्यक्ष बसावा असा गटनेते मंदार शिरसाट यांचा आग्रह होता, याच हट्टापायी अक्षता खटावकर यांना राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीची सत्ता गेली. दुर्देवानेच आमच्या मनात नसतानाही आम्हाला हा भाजप प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला. आम्ही सर्व नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची कल्पना ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांना सर्व नगरसेवकांनी दिली होती. मात्र आम्हाला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही. आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसचे नेते खडबडून जागे झाले. आम्हाला वैभव नाईक व अन्य नेत्यांनी त्यावेळी मायेची थाप दिली असती तर आम्ही थांबलो असतो, परंतू तसे न झाल्याने नाइलाजास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत गटनेते शिरसाट यांनी व्हीप बजावूनही नगरसेविका श्रुती वर्दम यांनी आमच्यातून फुटून विरोधात मतदान केले. तरीही अजून पर्यंत त्यांच्यावर गटनेते व ठाकरे सेना पक्षाने का कारवाई केली नाही? असा सवालही श्री. शिंदे यांनी उपस्थित केला. शहर विकासासाठी भरघोस विकास निधी दिला जाईल, पक्षात मान सन्मान दिला जाईल व भविष्यात न.पं. निवडणूकीत पूर्णपणे ताकद दिली जाईल असा शब्द रविंद्र चव्हाण यांनी आम्हाल्या दिल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उदय मांजरेकर म्हणाले, शहराचा विकास व्हावा, प्रत्येक प्रभागाला मोठा निधी मिळावा, म्हणून आम्ही भाजपात प्रवेश केलेला आहे. रविंद्र चव्हाण, नारायण राणे व नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत. आमच्या भाजप प्रवेशाबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेले आरोप निराधार आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करुन तसे सिद्ध करावे, असे आव्हान श्री. मांजरेकर यांनी दिले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आमच्यातल्या नगरसेविका श्रुती वर्दम फुटल्या तेव्हा त्यांना थांबविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी का प्रयत्न केले नाहीत?, त्यांना थांबवले असते तर न.पं.त सत्ता राखता आली असती, परंतू नेत्यांचे याकडे दुर्लक्ष झाले. तसेच महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उशिरा दिल्याने आम्हाला रणनिती आखता आली नाही, असे श्री. मांजरेकर म्हणाले.

श्रेया गवंडे म्हणाल्या, आम्ही आतापर्यंत पक्षाशी प्रामाणिकच राहीलो आहोत. प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणेच काम केल्याचे सर्वांनी बघितले आहे. त्यावेळेला आम्ही कोणाच्या आमिषाला बळी पडलो नाही. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीतही आम्हाला आमिषे आली होती. तेव्हाही आम्ही त्या आमिषांना बळी न पडता आम्ही सगळे एकजुटीने एकत्र राहीलो आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रामाणिकपणे मते दिली. मग अशावेळी आम्ही जर आमिषांना बळी पडलो नाही, तर का पडू. आम्ही फक्त आणि फक्त शहराच्या विकासासाठीच भाजपात गेलो आहोत. केंद्र व राज्यात सत्ता भाजपची आहे. त्यामुळे पर्यायाने शहराचा आणि प्रभागाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठीच आम्ही भाजपात आम्ही प्रवेश केला आहे. आणि लोकशाही आहे. लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे श्रेया गवंडे म्हणाल्या.

error: Content is protected !!