संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पालकमंत्र्यांनी दिली खेळाडूंना ग्वाही
कणकवली : संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलीय. 25 वर्षात लोकांसाठी सातत्याने काम केलं जातं आहे. आपल्या जिल्ह्यात क्रिकेट वर प्रेम करणारे बरेच लोक आहेत. त्यामुळे आपल्या कारकीर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हक्काचं मैदान असावं यासाठी मी राणे साहेबांशी बोललो आहे. आणि ते देखील त्यासाठी सकारात्मक आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील चांगल व्यासपीठ मिळाव. आणि कोकणाचा आवाज भारतीय संघात देखील आला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू. लोकाभिमुख काम करत असतानाच संदीप मेस्त्री मित्रमंडळाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून जिल्ह्यातील असंख्य युवकांना व्यासपीठ मिळवून दिले त्याबद्दल संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक करीन असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.
भाजपा युवा मोर्चा पुरस्कृत व संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंता अजयकुमार सर्वगोड, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अशिये सरपंच महेश गुरव, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, प्रकाश सावंत, संदीप मेस्त्री मित्रमंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे, प्रज्वल वर्दम, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, समीर कवठकर, परेश कांबळी आदींसह कार्यकर्ते व क्रीडा रसिक उपस्थित होते. संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने मागील 25 वर्ष सातत्याने विविध सामजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यात आदर्शवत असलेल्या संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात
असून यावर्षी प्रथमच प्रकाश झोतातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये असून द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपये व आकर्षक चषक असे स्वरूप आहे. या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील 16 संघांनी सहभाग घेतला असून गोवा व महाराष्ट्र राज्यातील नामांकित खेळाडू आयकॉन म्हणून या स्पर्धेत खेळत आहेत. या स्पर्धेचा अंतिम दिवस रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी असून या अंतिम सोहळ्यास सर्व क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते निलेश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार मिलिंद मेस्त्री यांनी मांडले.
संदीप चा आमदार आता पालकमंत्री झालाय – नितेश राणे
एक आदर्श आणि निष्ठावान कार्यकर्ता आणि आता एक आदर्श सरपंच म्हणून अतिशय उत्कृष्ठ काम संदीप मेस्त्री काम करत आहेत. संदीप मेस्त्री मिलिंद मेस्त्री यांसारख्या युवा कार्यकर्त्यांनी राणे कुटुंबियांवर जीवापाड प्रेम केलंय त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमचं कर्तव्य अजून आम्ही उपस्थित असतो. संदीप सरपंच होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले मात्र कलमठच्या जनतेने आदर्श लोक प्रतिनिधीला निवडून दिलं म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो. कलमठचा झपाट्याने होत असलेला विकास इतर गावांसाठी आदर्श आहे. आता तर संदीप चा आमदार कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री झालाय. आता माझ्या पूर्ण मतदार संघातील आमच्या महायुतीच्या विचारांच्या सरपंचांचे भरभराटीचे दिवस आलेत. जगात काय चाललय कोण वेगळा प्रयोग केला असेल नवीन योजना राबविल्या जातात तस संदीप मेस्त्री हे तरुण सरपंच आहेत त्यांनी त्यादिशेने पावल टाकावीत. निधीची चिंता करू नये. असे गौरवोद्गार यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.













