शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा निर्णय
खासगी, सीबीएससी, आयसीएससी , कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू
मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केले आहे.एकीकडे मंत्री उदय सामंत यांच्याकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारी अधिसूचना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे देण्यात आली आहे तर दुसरीकडे शक्षण मंत्री दादा भुसे यांनी मराठी भाषेला सर्व शाळांमधे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळांमधून लुप्त होऊ पाहणारी मराठी भाषा पुन्हा एकदा गर्जनार.
महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळेचे प्रमाण वाढते आहे. इंग्रजी शाळांमधून मराठी शिकवण्याची टाळाटाळ केली जात आहे. तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. महाराष्ट्रामधील शाळांमध्ये मराठी भाषेचा आग्रह मागील अनेक वर्षांपासून केल जात आहे. याबाबत आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई
राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर दादा भुसे यांनी शालेय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. दादा भुसे हे आता ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांनी सर्व शालेय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा संस्थाचालक संघटना यांच्याशी संवाद साधून चर्चा देखील केली आहे. “यानंतर आता त्यांनी मराठी भाषा शिकवण्याबाबत निर्णय घेतला असून मराठी भाषा सर्व मराठी, इंग्रजी माध्यमातील भाषांना अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा देखील दादा भुसे यांनी दिला आहे.माध्यमांशी संवाद साधताना दादा भुसे पुढे म्हणाले की, “शालेय शिक्षण विकासाचा एक दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल. इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी राज्यात मराठी भाषा महत्त्वाची आहे. आता या भाषेला केंद्राकडून अभिजात ही दर्जा मिळाला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे. मात्र तरी काही शाळा यातून पळवाट काढत आहेत.
खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू
अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. यामुळे खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे. त्यानुसार मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे”, अशा सूचना दादा भुसे यांनी केल्या आहेत.”तसेच मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असणार आहे. ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील, त्याची तक्रार पालकांना करता येणार आहे. तसेच या अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे”, असा सूचक इशारा देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.













