पंतप्रधानांच्या आवाहनाला शासनाकडूनच हरताळ!

वैभव नाईक यांची टीका

कणकवली : पेट्रोल, डिझेल वापर कमी करा, सोन्यावरील वाढती गुंतवणूक थांबवा. परदेश दौरा करु नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला आवाहन करत आहेत. मात्र, मंत्र्यांच्या ताफ्यात पुढे आणि मागे चार-चार गाड्या असतात, अधिकारी विविध ठिकाणी वाहने फिरवून पेट्रोल, डिझेलचा गैरवापर करतात. मंत्रांनी गर्दी दाखवण्यासाठी ताफा कमी केला तर मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेलची बचत होऊ शकते. मोदींच्या आवाहनाला शासनाकडूनच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे निर्बंध लादल्याने केवळ सामान्य जनताच या महागाईत होरपळू नये, असा टोला उद्धवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

याबाबतच्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचे बचतीचे आवाहन केले आहे. परदेशी दौरे थांबवा, असे आवाहन मोदींनी केले आहे. परंतु १५ मे पासून पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात आहेत. दुसरीकडे सामान्य नागरिक पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे हैराण झाले आहेत. गरज असेल तरच लोक घराबाहेर पडत आहेत. नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांसाठी दुचाकी वापरणाऱ्या सामान्य माणसावर याचा मोठा परिणाम होत आहे. पेट्रोल दरवाढीमुळे आधीच होरपळणाऱ्या जनतेवर नव्या करांचा बोजा पडणार आहे. सामान्य माणूस या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकणार नाही, अशी सध्या स्थिती आहे.

शासकीय यंत्रणेमधील वाहनांच्या वापराबाबतही शासनाने नियंत्रण आणले पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसेवकांपासून शिक्षकांपर्यंत, अधिकारी त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी राहिले तरी इंधनाची बचत होईल, त्याची अंमलबजावणी करावी. सामान्य लोकांसाठी सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक असते. अडचणीच्या काळात उपयोगी पडावे म्हणून लोक थोडं थोडं सोनं खरेदी करतात. देशहितासाठी लोक सोन्याची खरेदी कमी करतील. मात्र, मोठे उद्योगपती, राजकीय नेते आणि गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. त्यांच्यावर शासन कारवाई करणार का? असा खरा प्रश्न आहे.

मोदी शासनाच्या नोटबंदीच्या काळात सामान्य जनता जशी होरपळली, तशीच परिस्थिती पेट्रोल आणि सोन्याच्या मुद्द्यावर होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे.शासनाने सामान्य जनतेला कोणत्याही मार्गातून वेठीस धरु नये, अन्यथा उद्धवसेना तीव्र आंदोलन करेल,असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे.

error: Content is protected !!