वेंगुर्ले : सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीररित्या वाळू उपसा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अशा बेकायदेशीर वाळू उपशाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच पर्यटकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
हा प्रकार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. दरम्यान या प्रकाराने किनाऱ्यावरील नैसर्गिक रचना धोक्यात येत असून, यामुळे भविष्यात किनाऱ्याचीही झीज वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.