आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र

कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या उपाययोजना करणार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी डॉ. संजय भावे, कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना पत्र पाठवून याबाबत माहिती मागवली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी हवामानातील अनियमित बदल, तापमानातील तीव्र चढ-उतार तसेच विविध कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा व काजू पिकांचा मोहोर जळून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादनावर परिणाम झाला असून शेतकरी व आंबा बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

अनेक शेतकरी व आंबा बागायतदारांनी प्रत्यक्ष भेटून याबाबत खंत व्यक्त केल्याचे खासदार नारायण राणे यांनी पत्रात नमूद केले आहे. आंबा व काजू मोहोर झाडावर जळून जाण्याची नेमकी कारणे काय आहेत, याबाबत माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पुढील वर्षी आंबा व काजूचा मोहोर झाडावर जळून जाऊ नये यासाठी कृषी विद्यापीठामार्फत कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याबाबतही सविस्तर माहिती देण्याची विनंती खासदार राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.

error: Content is protected !!