समाजसेवा हाच राणेसाहेबांचा खरा संस्कार – नाम.नितेश राणे

कणकवलीत ‘खाऊगल्ली २०२६’ उत्साहात

कणकवली : राजकारण आणि निवडणुका येत-जात राहतात, पण जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. पालकमंत्री नाम. नितेश राणे आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील टीम ‘खास. नारायण राणे यांच्या’ संस्कारांतून घडलेली असून, पद असो वा नसो, जनतेची सेवा हीच आमची ओळख आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले. कणकवली येथे आयोजित ‘खाऊगल्ली २०२६’ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री ना. नितेश राणे बोलत होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्निल राणे, संजय कामतेकर, राजू गवाणकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे , आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत, संजीवनी पवार, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पूढे बोलताना ना. नितेश राणे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाला कणकवलीकरांसह संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुलांच्या आनंदाचा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित होणारा हा उपक्रम यंदाही तितक्याच दिमाखात पार पडला. लहान मुलांसाठी आयोजित या खास कार्यक्रमात मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून कणकवलीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राणेसाहेबांच्या विचारांचे प्रतिबिंब कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी समीर नलावडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.समीर नलावडे यांच्यातील सेवाभाव हा सन्माननीय नारायण राणे साहेबांच्या संस्कारांचे प्रतिबिंब आहे. जनतेच्या सुखासाठी झटणे आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे हीच आमची कार्यपद्धती आहे, असेही ना. नितेश राणे म्हणाले.

गणपतीसाना परिसर लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. उद्घाटनापूर्वी लहान मुलांनी पन्नास रुपयाचे कुपन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुलांनी विविध खेळ खेळून कार्टून सह सेल्फी पॉईंटवर रेंगाळत खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. मिकी माऊस, छोटा भीम, डोरेमॉन अशी कार्टून्सने लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्यासोबत धम्माल केली. लहान मुलांना प्रश्न विचारून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. त्याचप्रमाणे मुलांसाठी लकी ड्रॉ काढून बक्षिसेही देण्यात आली.

खाऊ गल्ली उपक्रमामुळे टेंबवाडी रस्ता ते गणपती सान्यापर्यंत संपूर्ण परिसर गर्दीने गजबजून गेला होता. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील दुतर्फा लागले होते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकानेही होती. बच्चे कंपनीसाठी खास गोल फिरणाऱ्या गाड्या, झोपाळे असे विविध प्रकारचे खेळ होते. लहान मुलांना आनंद, मज्जा मस्ती करता यावी यासाठी काही वर्षापासून सातत्याने समीर नलावडे मित्र मंडळाच्यावतीने खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही या उपक्रमाला लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!