मालवण : तालुक्यातिल मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुणगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगार आगीच्या भक्षस्थानी पडला तर यामध्ये या गरीब शेतकऱ्याची चार जनावरे होरपळून जबर जखमी झालेली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे या शेतकऱ्याचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या मंदार मुनगेकर याच्यापुढे शेती हंगामातच दुःखाचे सावट पसरले असून शासकीय पातळीवरती तसेच राजकीय पातळीवर मोठ्या मदतीची अपेक्षा येतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
मंदार मुणगेकर यांचा वस्तीपासून दूर अशा कावावाडी हुरास येथील शेतीमध्ये शेतमांगर होता. या शेतमांगरामध्ये त्याची चार जनावरे, गुरांना लागणारे पावसाळी संपूर्ण खाद्य, गवत, त्याचप्रमाणे नारळ, लाकडे, सोडणे अशा प्रकारचे साहित्य साठा केलेला होता. तसेच विहिरीचा एक मोठा पंप सुद्धा यात शेतमागरात होता. हे सर्व साहित्य आणि संपूर्ण मांगर पूर्णपणे जळून खाक झाला. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास या शेतमांगराला आग लागत असल्याचे या ठिकाणापासून जवळच गड नदीच्या पलीकडे असणाऱ्या भगवंतगड या गावातून एका ग्रामस्थाने कावावाडी येथे दूरध्वनी करून मळ्यामध्ये मोठी आग लागली असल्याचे सांगितले. आगीची खबर मिळताच येथील ग्रामस्थांनी लागलीच वस्तीपासून दूर असलेल्या या शेतमांगराकडे धाव घेतली. लगतच असलेल्या विहिरीवरून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु काळोखी रात्र आणि आग विझवण्यासाठी असणारे अपुरे साहित्य यामुळे येथील ग्रामस्थांना आग विझवणे हे मोठे कष्टाचे बनले होते. मुळातच या ठिकाणी आग लागल्याचे उशिरा समजल्यामुळे आधीच संपूर्णपणे शेतमांगर जळून खाक झाला होता.
यापेक्षाही मोठी हृदयाद्रावक घटना म्हणजे या शेतमांगरात या गरीब शेतकऱ्याची चार जनावरे होती ती आग लागतात जोरजोरात हंबरडा देऊन ओरडत होती. परंतु चारी जनावरे बांधलेली असल्यामुळे ती सुद्धा आगीमध्येच सापडली होती. या जनावरांची कातडी संपूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडली होती. जेव्हा त्यांची दावे तुटली तेव्हा ही चारी जनावरे कशी तरी बाहेर येऊन भीतीने थरथर कापत होती.
संपूर्णपणे ही जनावरे जळलेल्या अवस्थेत होती. लागलीच येथील ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला बोलावून या जनावरांना औषध पाणी केले. परंतु ही चारही जनावरे एवढी जबर जखमी आहेत की अक्षरशा मृत्यूशी झुंज देत आहेत. शेती हंगामात या गरीब शेतकरी कुटुंबाला हा बसलेला मोठा धक्का आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी या भागातील तात्या हिंदळेकर, सतीश मसुरकर, जीवन मुणगेकर, ओमकार मुणगेकर, पांडुरंग गोलतकर, चंदू पाटील, कल्पेश वायंगणकर, बंटी मुणगेकर, पंढरी मसुरकर, रुद्र मसुरकर, अवतार मसुरकर, देवानंद कांबळी, जितू खोत, कृष्णा पाटील, विजय हडकर, बाबल्या मुणगेकर आणि कावावाडीतील ग्रामस्थांनी जीवावर उदार होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थानी या चारही मुक्या जनावरांना उचलून आणून त्यांना वैद्यकीय मदत करताना मोठे सहकार्य केले. ऐन शेती हंगामात या गरीब शेतकरी कुटुंबावर आलेल्या संकटाला सहाय्य करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती तसेच राजकीय पातळीवरती मोठी मदत होणे गरजेचे असल्याचे येथील ग्रामस्थांची मागणी आहे. शनिवारी संध्याकाळी उशिरा मसुरे तलाठी आणि महसूल विभागाच्या वतीने पंच यादी घालण्यात येणार आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरसाट आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या आगीत जखमी झालेल्या जनावरांची तातडीने उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या जनावरांवरती उपचार करण्यासाठी ही पशुवैद्यकीय टीम दिवस रात्र झटत आहे. याबाबत जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सुद्धा येथील ग्रामस्थांनी लक्ष वेधले असून या जनावरांना अजून तातडीने चांगली आरोग्य सुविधा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचे सुद्धा लक्ष वेधले आहेत. तसेच या गरीब शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन दिले. दरम्यान जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सरोज परब यांनीही घटनास्थळी पाहणी करून गरीब शेतकऱ्याला धीर देऊन प्रशासकीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.













