कळसुली सरपंच सचिन पारधीये यांचा इशारा
कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा गेले तीन दिवस ठप्प आहे. कळसुली गावात बीएसएनएल नेटवर्क शिवाय कोणत्याही टॉवरचे नेटवर्क येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल, बँक, पोस्ट, आदींना गावात नेटवर्क नसल्याने मोठा फटका गावातील नागरिकांना बसत आहे. लवकरात लवकर जर नेटवर्क सेवा सुरळीत झाली नाही तर कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा कळसुली सरपंच सचिन पारधीये यांनी दिला आहे.
कळसुली गावची लोकसंख्या साडे तीन हजार च्या आसपास असून गावात बीएसएनएलचे दोन टॉवर असून, देखील ते वारंवार बंद होत असल्याने, कळसुली गावचे सरपंच सचिन पारधीये यांच्यासह ग्रामस्थांनी अखेर कणकवली येथील उपमंडल अधिकारी बीएसएनएलच्या कार्यालय भेट देऊन निवेदन देऊन बीएसएनएलच्या सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
कळसुली गावातील दोन्ही बीएसएनएल टॉवर येत्या आठ दिवसात सुरू करा. अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला टाळ ठोकणार असल्याचा इशारा कळसुली सरपंच सचिन पारधीये यांनी बीएसएनएलच्या उपमंडल अधिकाऱ्यांना यावळी दिला. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबुन असणाऱ्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा फटका बसला आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी अशी मागणी कळसुली गावचे ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांनी केली आहे.
यावेळी कळसुली ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चव्हाण, मोहित सावंत, तुळशीदास परब, दत्तात्रय शिर्के ,रमेश राणे, बळीराम राणे ,प्रभाकर दळवी, सागर शिर्के, अक्षय मुरकर,आर्यन शिर्के, सह कळसुली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.













