“
“रुग्णांच्या वेदना जाणून घेताना, त्यांना सेवा देताना स्वतःला सांभाळायला शिका. स्वतःला जपा . परिचारिका वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहे. त्यांनी स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सांभाळलं पाहिजे.कारण तुम्ही सुदृढ व आनंदी असाल तरच रुग्णाला चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकता. आयुष्य जगत असताना जीवनात चांगल्या मूल्यांना स्थान द्या, त्यांना जपा तरच तुम्ही स्वतःच्या भूमीकेला न्याय देऊ शकता, कारण आपल्याकडे येणारे रुग्ण त्यांच्या बऱ्याच प्रकारच्या शारीरिक व मानसिक वेदना घेऊन आलेले असतात. त्यांना समजून घेऊन सेवा देणे हे अत्यंत गरजेचे आहे .कारण तुम्ही सर्व परिचारिकाच आरोग्य यंत्रणेमध्ये रुग्णांच्या जास्त सोबत असता. त्यांचं सकारात्मक वागणच रुग्णाला बळ देत.”,असे उद्गार सहाय्यक धर्मदाय आयुक्त सौ. अवंतिका कुलकर्णी यांनी काढले. ते बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे ,जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या क्षेत्रामध्ये स्त्रियांचा जास्त भरणा आहे .स्त्री ही अबला नसून सबल आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची ताकद ओळखा .असेही मार्गदर्शन त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये केले.
दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व फ्लोरेन्स नाईंटीगल यांची प्रतिमा पूजन करून शुभारंभ झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. उमेश गाळवणकर, नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ .कल्पना भंडारी प्रा.सौ. वैशाली कोलगावकर ,सौ.शांभवी आजगावकर,सौ. सुमन करंगळे प्रणाली मयेकर, प्रथमेश हरमलकर, वैजयंती नर, शंकर माधव आदी उपस्थित होते .
संस्था चेअरमन उमेश गळवणकर यांनी आपल्या मनोगतातून “नेहमी आनंदी रहा, कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुमच्या हातून रुग्णसेवा उत्तम होईल. कारण निर्मळ हास्य हेच सर्व आजारांवरील एक सर्वात उत्तम असा उपाय आहे… आणि ज्याला आपल्याला पैसे अजिबात द्यावे लागत नाहीत. त्यामुळे उत्तम आरोग्य मिळवा व सुदृढ रहा.” असे सांगत शुभेच्छा दिल्या ,. नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ.कल्पना भंडारी यांनी ही सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी भित्तीपत्रिका, प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ,यावेळी या स्पर्धांच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच शैक्षणिक वर्षात विविध कलागुणांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील गुणगौरव या दिनाच्या औचित साधून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कुमारी .सेजल नाईक हिने केले.