सावंतवाडी : शहरातील सर्वोदय नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी पुरेसा मिळत नाही. नियोजनतेचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गेले तीन आठवडे पाण्यासाठी सर्वोदय नगरवासियांची चांगलीच दमछाक होत आहे. नळाला पाणी येत नसल्यामुळे सातत्याने पाण्यासाठी नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. अनेकदा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील काहीही उपयोग झालेला दिसत नाही. आता अर्धा एप्रिल महिना संपला आहे. अजून किमान दीड ते दोन महिने पावसाळा सुरू व्हायला अवकाश असल्याने भविष्यातील अडचण लक्षात घेता यात अत्यंत बारकाईने लक्ष घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नुकतेच सर्वोदय नगर भागातील रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक सुनील राऊळ व सौ. मेघना राऊळ यांच्या नेतृत्वाखाली सर्वोदय नगर रहिवासी शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाच्या मुख्याधिकारी सौ. अश्विनी पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. यावेळी सुनील राऊळ, नारी शक्तीच्या रनरागिणी मेघना राऊळ, दिशा कामत, शरयू बार्देस्कर, सौ. शुभांगी नार्वेकर, सौ. अनुश्री राणे, विद्याधर तावडे, प्रकाश परब, वासुदेव शिरोडकर, गुंडु साटेलकर, संजय नार्वेकर, गुरुदास कामत, एस. एस. नाईक, रोहन नार्वेकर, श्री. कोरगावकर, अमन बार्देस्कर, कुलकर्णी, सौ. बोर्डेकर, ओंकार राणे, छाया पालव, रोशनी गावडे, सुनंदा गवस, स्मिता कुलकर्णी, रतन भोसले, मेघा बोर्डेकर आदि उपस्थित होते.
दरम्यान, शुक्रवारी भारतीय जनता पार्टीचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वोदय नगर रहिवासी शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे हा प्रश्न मार्गी लावण्याची अंतिम विनंती केली आहे. यावेळी अजय गोंदावळे यांच्या समवेत सौ. मेघना राऊळ, शरयू बार्देस्कर, श्रीमती नार्वेकर, सौ. अनुश्री राणे, श्री. गुरुदत्त कामत यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, लवकरच हा प्रश्न सुटेल, असा आशावाद सर्वोदय नगर रहिवासी संघाचे प्रवर्तक सुनील राऊळ यांनी व्यक्त केला आहे. जर तसे झाले नाही तर रहिवासी संघातर्फे तीव्र आंदोलनही छेडण्याचा इशारा यावेळी सर्वोदय नगर रहिवासी बांधवांनी दिलाय.













