कणकवली : कणकवली नगरपंयायतीच्या बाजूला सौ. राजश्री धुमाळे यांच्या घराशेजारी भटक्या कुत्र्यांचे शाळकरी मुले व शहरातील नागरीकांवर वारंवार हल्ले होत आहेत. मधलीवाडी येथील नविन डी.पी रोड वर सकाळी सायंकाळी चालण्याकरिता येणाऱ्या लोकांवर सुध्दा भटके कुत्रे धावून जाऊन हल्ले करत आहेत. मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ममता पवार (वय ३६, रा. पिळणकरवाडी) या महिलेवर कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतला. बांधकरवाडी येथील तरुणांनी एकत्र येऊन कुत्र्यांना हाकलवून लावले. अन्यथा मोठा अनर्थ ओढावला असता.
नगरपंचायतीच्या अगदी बाजूलाच हे भटक्या कुत्र्यांचे टोळके असून शाळकरी मुले, महिला यांच्यावर असे नेहमीच प्रसंग येत असतात. त्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण आहे, तसेच जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या मागे कुत्रे धावत येत असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. या कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी कणकवलीतील नागरिकांकडून होत आहे.