चक्क उन्हाळ्यात केली वृक्ष लागवड…..
सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार सुरु असून कडक उन्हाळ्यात तालुक्यात रस्त्याच्या दूतर्फा झाडे लावण्यात येत आहेत. एकीकडे झाडे लावली जात आहेत तर दुसरीकडे कडक उन्हामुळे लावलेली झाडे करपून जात आहेत. कडक उन्हाळ्यात लावली जात असलेली ही झाडे जगविण्यासाठी नाही तर ठेकेदार व अधिकाऱ्यांना जगविण्यासाठी लावली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड केली आहे. यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अजब कारभारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे राजकिय नेते मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
जे.सी.बी.च्या सहाय्याने छोटे-छोटे खड़े मारण्यात आले होते. पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी खड्डे मारले असावेत असे नागरिकांना वाटत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून चक्क जंगली झाडे लावण्यास सुरवात केल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खड्डयात पाणीही न घालता सुक्या मातीत झाडे लावली जात आहेत. गेले काही दिवस तापमाणात कमालीची वाढ झाली आहे. तब्बल 35-43 डिग्री तापमानाची नोंद होत आहे. कडक उन्हामुळे लावलेली झाडे सुकून जात आहेत.
कदम, फळस, बहावा, गुलमोहर, वड, मोहगाणी, पांगरा, श्यामली, बकुळ, अर्जुन, करंज, ताम्हण, पिंपळ, अशा प्रकारची जंगली झाडे लावली जात आहेत.
साधारणतः झाडे लागवड ही पहिल्या पावसानंतर जून, जुलै महिण्यात केली जाते. त्यादरम्यान जमिनीत ओलावा असतो, तापमान कमी असते. अशा वातावरणात झाडे लावली जातात. त्यामुळे पुढील चार महिने निसर्गच त्या झाडांना जगविण्याचा प्रयत्न करतो. मात्र कडक उन्हाळ्यात जमीनीत पाणी नसते. समजा पाणी घातले तरी त्याचा होणारा निचरा व कडक उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत पाणी जात नाही. झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभाग काय साध्य करीत आहे. असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
खरे तर झाडे लावणे त्यांचे संवर्धन करणे यासाठी तांत्रिकदृष्टीने कृषी विभागात त्या विषयांचे तज्ज्ञ मंडळी असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम सोडून चक्क झाडे लावण्याचे ते पण कडक उन्हाळ्यात हाती घेतलेले काम सर्वांनाच आश्चर्ययचकित करणारे आहे.
दरवर्षी शासनाच्या विविध विभाग, स्वयंसेवी संस्थांकडून वृक्ष लागवड केली जाते. यावर शासनाचे लाखो रुपये खर्च केले जातात मात्र लावलेली झाडे किती जगली याचा आढावा घेतला जात नाही. अन्यथा एवढ्यात सगळीकडेच जंगले दिसली असती.
काही दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील ग्रामस्थांनी उन्हाळ्यात लावण्यात येत असलेल्या या झाडांबाबत तीव्र विरोध केला होता. आणि या बाबत आवाज उठवण्यात आला होता. मात्र या सर्वनी दुर्लक्ष करीत, केवळ उद्दिष्ट प्राप्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वृक्ष लागवडीची मुजोरी सुरु आहे. शासनाचे लाखो रुपये असे मातीत घातले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.













