भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांचे प्रतिपादन
कुडाळ : संत रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासात या दोन्ही महनियांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी आज कुडाळ येथे केले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा गौरव रत्नांचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी संस्थान मराठा समाज सभागृहात कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा गौरव रत्नांचा या पुरस्काराने सन्मानित सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष सी आर चव्हाण, सरचिटणीस संतोष जाधव, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, उद्योजक बाबल पावसकर, प्राजक्त चव्हाण, अरुण होडावडेकर, मालिनी चव्हाण, डॉ प्रतीक्षा चव्हाण, भारत पेंडुरकर, सहदेव चव्हाण, समाजसेवक बबली राणे, देवगड अध्यक्ष सुरेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत देवरुखकर गुरुजी, संचालक गणेश चव्हाण, जेष्ठ नागरिक अध्यक्ष रमेश कुडाळकर, उपाध्यक्ष गणपत चव्हाण, सहसचिव अंकुश चव्हाण, संतोष चव्हाण, संजय चव्हाण, संजीवनी चव्हाण, प्रभाग अध्यक्षा प्रमिला चव्हाण,रमेश चव्हाण, उपाध्यक्ष सहदेव चव्हाण, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा चव्हाण संतोष चव्हाण, मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले, इतिहासाची पाने प्रत्येकाने चाळली पाहिजेत. आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विसरता कामा नये. समाजाच्या वाटचालीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान फार मोठे आहे. सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. असा आदर्श राजा भविष्यात होणे शक्य नाही. त्यांचा आदर्श प्रत्येकाने जोपासून वाटचाल केली पाहिजे. आपला समाज संघटित रित्या न्याय्य प्रश्नासाठी एका छत्राखाली येणे काळाची गरज आहे. आज समाजात अनेक पदावर कार्यरत असणाऱ्यां रत्नांचा गौरव करण्यात आला. विविध समाजात कार्यरत असणाऱ्याचा गौरवही यावेळी करण्यात आला असे सांगितले. सरचिटणीस संतोष जाधव यांनी प्रत्येकाला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती असला पाहिजे. आज राजांमुळेच आम्ही सर्व आहोत. रयतेचा राजा म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण जागतिक पातळीवर आहे. अशा राजाच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या भारतीय चर्मकार समाजाच्या वतीने अनेकांचा गौरव होत आहे हे सुद्धा आपल्या समाजासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. आवळेगाव बीटचे पोलीस कर्मचारी मंगेश जाधव यांनी माझा माझ्या समाजाने केलेला गौरव हा मला प्रेरणा देणारा आहे असे सांगितले. जिल्हाध्यक्ष सी आर चव्हाण यांनी आपला समाज हा एकत्र येऊन होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटित झाला पाहिजे. विविध प्रश्नासाठी आवाज उठवला पाहिजे. आपला समाज आज इतर समाजासोबतही वावरत आहे. हे आपल्याला आपल्या समाजासाठी निश्चितच प्रेरणा देणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गेली 25 वर्षे समाज क्षेत्रात कार्यरत असणारे ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणेंसह समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पेडुरकर यांनी केले तर आभार संतोष जाधव यांनी मानले.













