तळवडे: “सन्मानाने जगायचं असेल, तर स्वतःच्या हक्कांची जाणीव असायलाच हवी” असे प्रभावी विचार युवा फोरम इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. यशवर्धन जयराज राणे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. इंग्रजी माध्यम शाळा, तळवडे येथे आयोजित “A Dignified Life with Aseptic and Human Right Awareness” या विशेष सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील उदाहरणे देत त्यांनी स्वच्छता, आत्मसन्मान, समानता आणि स्वतःच्या हक्कांची जाणीव कशी महत्त्वाची आहे हे समजावून सांगितले. हक्क ही केवळ पुस्तकी गोष्ट नसून, ती रोजच्या जीवनाचा भाग आहे हे विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा शैलीत त्यांनी संवाद साधला.
सत्रादरम्यान ‘हक्क म्हणजे काय?’, ‘स्वच्छतेतून आत्मसन्मान कसा वाढतो?’, ‘शिवाजी महाराजांचे धोरण आणि आजचे मानवाधिकार’ यासारख्या मुद्द्यांवर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी ग्लिटर-हात स्वच्छता प्रयोग, रोल-प्ले आणि मजेदार प्रश्नोत्तरे यासारख्या उपक्रमांमुळे सत्र अधिक उत्साहपूर्ण झाले.
पालकांचाही मिळाला मोठा प्रतिसाद
या सत्रात विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही चांगला सहभाग दिसून आला. “शिवाजी महाराज यांना जिजाऊसाहेबांनी दिलेले शिक्षण त्यांना महान बनवले, तसेच आपल्या मुलांमध्येही आत्मसन्मान आणि योग्य हक्कांची जाणीव निर्माण करणं आवश्यक आहे” हा विचार त्यांनी उचलून धरला.
कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी “मी स्वतःचा आणि इतरांचा सन्मान करेन, माझे हक्क जाणून घेईन आणि समाजात सकारात्मक बदल घडवेन” अशी शपथ घेतली. या विशेष सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि पालकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली, अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक अजय वामन बांदेकर यांनी दिली.
युवा फोरम इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून असे अनेक विधायक उपक्रम घेतले जातील, अशी ग्वाही ॲड. यशवर्धन राणे यांनी दिली. यावेळी युवा फोरम भारतचे उपाध्यक्ष अमोल निकम सदस्य शुभम वेंगुर्लेकर उपस्थित होते.













