तरीही तुरूंगाबाहेर येता येणार नाही?
तर भक्तांपासूनही दूर राहावं लागणार
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव बाहेर येण्यास परवानगी दिली आहे.मात्र, या काळात त्याला जामीनाच्या कठोर अटींचं पालन करावे लागणार आहे. जामीनादरम्यान आसाराम त्याच्या कोणत्याही अनुयायाला भेटू शकत नाही. आसाराम यांना ३१ मार्चपर्यंत तुरुंगातून बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतरही आसाराम तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. त्याला एक नव्हे तर दोन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अशा परिस्थितीत न्यायालय जोपर्यंत दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन देत नाही तोपर्यंत त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. आसारामला दोन प्रकरणांमध्ये शिक्षा झाली होती. जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार, आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 साली इंदूर येथील आश्रमातून अटक केली होती. तेव्हापासून आसाराम तुरुंगात होता. पाच वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर 25 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दोन प्रकरणांत दोषी
दुसरं प्रकरण आहे गुजरातच्या गांधीनगरचं. गुजरातमधील गांधीनगर येथील आश्रमातील एका महिलेनं आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 31 जानेवारी 2023 रोजी न्यायालयाने आसारामला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2013 मध्ये आसारामची अटकही नाट्यमय पद्धतीनं झाली होती. जोधपूर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यास नकार दिला होता. या मुलीचे वडील आसारामचे अनुयायी होते. त्यानंतर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. दिल्लीत झिरो एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर त्याची प्रत जोधपूर पोलिसांना देण्यात आली. दिल्लीत एफआयआर दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आला आणि जोधपूर पोलिसांवरही आसाराम बापूंवर कारवाई करण्यासाठी दबाव आला.
काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?
सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला तीन पोलिसांची सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. आसाराम बापू पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, अशी अट त्याला घालून देण्यात आली आहे. यासोबतच त्याला अनुयायांना भेटण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. गुजरातमधील एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मात्र, राजस्थानमध्ये दाखल झालेल्या अशाच एका प्रकरणात आसाराम बापूला अजूनही कोठडीत राहावे लागणार आहे.
जानेवारी २०२३ मध्ये सत्र न्यायालयाने आसाराम बापूला २०१३ च्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. गुन्ह्याच्या वेळी गांधीनगरजवळील आश्रमात राहणाऱ्या एका महिलेने आसाराम बापू यानं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
२०१३ च्या बलात्कार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आसारामच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारकडून उत्तर मागवले होते. त्यावर खंडपीठाने आसारामच्या वकिलांना सांगितले की, या मुद्द्याचे समर्थन करण्यासाठी वैद्यकीय आधार असेल तरच विचार केला जाईल.