नवीन वर्षानिमित्त जिव्हाळा सेवाश्रमचा नवा आदर्श

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीची साफसफाई

कुडाळ : जिव्हाळा सेवाश्रम वृद्धांची सेवा करतानाच स्वच्छतेचा वसासुद्धा गेल्या काही वर्षापासून जोपासत आहे. आज जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफसफाई करून एक सामाजिक आदर्श या जिव्हाळाने जोपासला आहे.


    आपला सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करत आहे प्रत्येक गाव प्रत्येक खेडे स्वच्छ झाले तर आपला सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेत अग्रेसर ठरेल हाच दूरदृष्टीकोन ठेवून येथील  समाजसेवक दादा बिर्जे यांनी जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून गेले तीन वर्षे स्वच्छतेचा वसा जोपासला  आहे. आज पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्यात आली. साफसफाई मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम राबवताना प्रत्येक ठिकाणी स्वच्छता कशी असेल या दिशेने जिव्हाळ्याने वाटचाल केलेली आहे. या मोहिमेत पिंगुळी ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे, राजू बिर्जे, साक्षी बिर्जे, संदीप बिर्जे, संजय बिर्जे, गीतांजली बिर्जे, पूनम बिर्जे या बिर्जे परिवारासह जिव्हाळा सेवाश्रमचे नाना राऊळ, प्रकाश प्रभू, बाबा गावडे, कालिदास गावडे, दीपाली पाटकर आदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सरपंच आकेरकर म्हणाले, पिंगुळी गाव स्वच्छता मोहिमेच्या उंबरठ्यावर आहे या स्वच्छता मोहिमेत जिव्हाळा सेवाश्रम या संस्थेने टाकलेले पाऊल निश्चितच गावासाठी प्रेरणादायी आहे. स्वच्छतेचा हा प्रवास गाव राबवत असतानाच जिव्हाळ्याने टाकलेले पाऊल आणि होत असलेला गावाचा  स्वच्छ परिसर ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. भविष्यातही गावाचं सुंदर गाव, कचरा मुक्त गाव करण्याच्या उद्देशाने वाटचाल करतानाच स्वच्छतेचा वसा  कायम ठेवू असे सांगितले. संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे यांनी गेली तीन वर्षे जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून वृद्धांची सेवा करता करता स्वच्छता हा आरोग्याचा महत्त्वाचा घटक आहे. या अनुषंगाने आम्ही स्वच्छतेची  मोहीम गेली तीन वर्षे राबवीत आहोत. पहिल्या वर्षी जिव्हाळा सेवाश्रम परिसरात माड्याचीवाडी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तर गेल्या वर्षी पिंगुळी एमआयडीसी येथील स्मशानभूमीत स्वच्छता राबवण्यात आली. या मोहिमेत शेकडो स्वच्छता दूत सहभागी झाले होते. आणि आज पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. स्वच्छता आरोग्याचा महत्त्व घटक असताना वाढत्या अस्वच्छतेमुळे रोग मोठ्या प्रमाणात होत आहेत. या रोगराईला आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. आज आमच्या जिव्हाळा सेवाश्रममधील सर्व सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन भविष्यात हा स्वच्छतेचा वसा आम्ही कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी उमेशचंद्र देसाई, धनंजय जाधव, रमेश चव्हाण,समीर तेंडोलकर, गुरुनाथ दाभोलकर नारायण राऊळ, गवळी, संतोष परब,बाबली खरात उत्तम, तसेच सुंदर मेस्त्री,पाटकर, संतोष सांगळे उपस्थित होते.

error: Content is protected !!