मुंबई प्रतिनिधी: लोकसभेत वन नेशन-वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले तेव्हा समर्थनासाठी 269 मते मिळाली. त्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकार साधारण बहुमत मिळवू शकले नाही. मग दोन तृतांश बहुमत कसे मिळवणार आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. परंतु या वेळी व्हिप जारी करुन भारतीय जनता पक्षाचे ११ खासदार गैरहजर होते. तसेच एनडीएचे जनसेनाचे बालाशौरी वल्लभानेनी गैरहजर होते.
आता पक्ष या गैरहजर राहणाऱ्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. त्यानंतर त्यांचे उत्तर आल्यावर निर्णय घेणार आहे.
कोण कोण खासदार गैरहजर होते?
भाजपने सोमवारीच आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप काढला होता. त्यानंतर भाजपचे अनेक खासदार उपस्थित नव्हते. त्यामध्ये केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत. गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नितिन गडकरी शांतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बी वाई राघवेंद्र, गिरिराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, विजय बघेल, उदयराज भोंसले, भागीरथ चौधरी, जगन्नाथ सरकार आणि जयंत कुमार रॉय यांचा समावेश आहे.