पालकमंत्री नितेश राणे यांनी सा.बा. ला डेडलाइन दिल्यानंतर खड्डे बुजविण्याची मोहीम गतिमान

कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक,माणगाव तिठा (कुडाळ) येथील खड्डे बुजविले

शहरवासीयांकडून समाधान व्यक्त

श्री.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम ऍक्टिव्ह मोडवर


कणकवली : कणकवली शहरातील नगरपंचायत हद्दीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचरा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील तसेच नगरपंचायत व जिल्हा परिषद हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तात्काळ बुजविण्यात आले. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस सुरळीत आणि प्रवासास सुखकर करण्यात आला आहे. श्री.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्यात आली आहे. आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनांची कार्यवाही गतिमान पद्धतीने सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

कणकवली आचरा या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच खड्ड्यांमुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाढणारी वर्दळ आणि रस्त्याची खराब झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल,सावंतवाडी विभागाच्या श्रीमती इंगवले यांना बैठकीदरम्यान तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आचरा रोड हा नियमित वर्दळीचा आणि गर्दीचा असल्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत काम करून रस्त्यावरील खड्डे बुजविले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, कणकवली तालुक्यातील तसेच विभागातील अन्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी रस्त्यांच्या प्रश्नावर तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही केल्याबद्दल कणकवली शहरवासीयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!