जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम

सिंधुदूर्ग नगरी प्रतिनिधी: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम २४ मार्च २०२५ “जागतिक क्षयरोग दिन” रोजी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

या मोहिमेचा उद्देश हा जास्तीत-जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे. क्षय रुग्णांचा मृत्युदर कमी करुणे. नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे. वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे. क्षयरोगाविषयी जनजागृती करणे. समाजातील क्षयरोग विषयी असलेले गैरसमज दूर करणे व सामाजिक कलंक कमी करणे.

कशी असेल क्षयरोग शोध मोहीम?

जिल्हयातील क्षय रुग्णांना “पंतप्रधान क्षयमुक्त भारत” अभियानांतर्गत निक्षयमित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असा आहे.१०० दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील ३४७ जिल्हयांमध्ये राबविण्यात येत असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेत जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करणे, निक्षय शिबीर घेणे. अनाथाश्रम, वृध्दाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबीर तसेच स्थलांतरित, ऊसतोडणी कामगार उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातील संशयित व्यक्तीची धुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी जिल्हा रुग्णालय सिंधुदर्ग तसेच तालुका स्तरावर करणेचे नियोजन करणेत आले असुन याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील यांनी केले आहे.

काय आहेत क्षयरोगाची लक्षणे?

दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला येणे. दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा ताप राहणे. रात्री घाम येणे. धुंकीतून रक्त पडणे. छातीत दुखणे. श्वसनास त्रास होणे. वजनात घट होणे आणि भुक मंदावणे. थकवा व अशक्तपणा जाणवणे. मानेवर किंवा शरीरावर इतर ठिकाणी गाठी येणे ही लक्षणे आढळल्यास नजिकच्या शासकिय आरोग्य केंद्रात मोफत तपासणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी केले आहे.

error: Content is protected !!