सांगवेत महसूल मंडळात महाराजस्व समाधान शिबिर

कणकवली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाविन्यपूर्ण योजनांमधून जनतेच्या हिताचे मोठे काम करत आहेत. अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे हे काम निश्चितच आनंद देणारे आहे. शासन लोकांपर्यंत जावून हे लोकहिताचे काम करत आहे. महसूल विभागातील विविध कामांसाठी नागरिकांना मोठी धावाधाव करावी लागते, मात्र या अभियानातून थेट लोकांपर्यंत पोहोचत असल्याने ही धावाधाव कमी होणार आहे, असे जि.प.सदस्य संदेश सावंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान सांगवे महसूल मंडळ येथे राबविण्यात आले. कनेडी येथील समाधीपुरूष हितचिंतक मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प.सदस्य संदेश सावंत यांनी भुषविले. जिल्हा पुनर्वसन विभागाच्या तहसीलदार शितल जाधव, कणकवलीचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे, सांगवे मंडळ अधिकारी श्रीमती पिंटो, पं.स.सदस्या राजश्री पवार, सांगवे सरपंच संजय सावंत,माजी सरपंच विजय भोगटे, भिरवंडे सरपंच नितीन सावंत, सांगवे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, समाधीपुरूष हितचिंतक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर सावंत, तलाठी पी.एस.बचाटे, विरेंद्र रासम, श्रृतीका पाटील, अजय मांडेकर, श्रीकृष्ण तटकरे, शुभम दळवी तसेच पोलिसपाटील, महसूल कर्मचारी, कोतवाल व नागरिक उपस्थित होते.
अभियानाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी हे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अभियानाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत आलो आहोत. नागरिकांनी अभियानाच्या माध्यमातून आपले प्रश्न प्रशासनासमोर मांडत त्यांचे निरसर करावे. नागरिकांचे समाधान करणे हाच अभियानाचा उद्देश आहे असे पुनर्वसन तहसीलदार शितल जाधव यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानामागची भुमिका तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी विशद केली. संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबविले जात असून महसूल विभागामार्फत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचताना त्यांच्या समस्या सोडविल्या जात आहेत, असे सांगितले.
अभियानामधून नवीन रेशनकार्डांचे वितरण, रेशनकार्डवरील नाव कमी-जास्त करणे, सातबारामधील चुकांची दुरूस्ती करणे, वर्ग २ चे वर्ग १ करणे, सातबारा व ८ अ चे वितरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी, जातीचा, नॉनक्रिमिलेअर व वय अधिवास दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच पी.एम. किसान, तुकडेबंदी शेरा कमी करणे, वारस आणि इतर विषयांचे प्रतिज्ञापत्र, आयुष्यमान भारत आदी योजनांची माहिती व रेशनकार्ड दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच अनेक लाभार्थ्यांचे अर्ज घेण्यात आले. अभियानासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अनेक नागरिकांच्या शंका, समस्यांचे निरसन तहसीलदार व अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. सूत्रसंचालन कनेडी विद्यालयाचे शिक्षक प्रसाद मसुरकर यांनी केले.

error: Content is protected !!