अंतिम प्रवासात माणुसकीचा हात

मोफत…वैकुंठ रथ सेवा…

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण

कुडाळ : मृत्यू नंतर दुःखाच्या क्षणी आर्थिक ओझे कमी करून अंतिम प्रवास सन्मानाने पार पाडता यावा, यासाठी कुडाळ शहरात मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरु करण्यात आहे. कुडाळातील प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम साकारला जात आहे. लवकरच या वैकुंठ रथाचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख ओंकार तेली यांनी दिली.

कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर मृतदेह घरी किंवा स्मशानभूमीत नेण्यासाठी खाजगी वाहनांकडून आकारले जाणारे अवास्तव भाडे अनेकांसाठी परवडणारे नसते. अशा वेळी नाईलाजाने जास्त पैसे मोजावे लागतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कुडाळ शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार असून यापूर्वीही त्यांनी वातानुकुलित शवपेटीची मोफत सेवा सुरू करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. व ही सेवा गेले 8 वर्षे सुरू आहे.

कणकवली व सावंतवाडी येथे उपलब्ध असलेली वैकुंठ रथ सेवा आता कुडाळमध्येही सुरू होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मृत व्यक्तीचा अखेरचा प्रवास अधिक सन्मानाने पार पाडता येणार आहे.

error: Content is protected !!